मराठी ई-बातम्या टीम
मागील आठ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदासाठी या हिवाळी अधिवेशनातच निवडणूक होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यानंतर ही निवडणूक फार क्लिष्ट न करता आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेत तशी दुरूस्ती कायद्यात करण्याचा निर्णय घेत तसा प्रस्ताव विधिमंडळात मांडला. परंतु त्यास भाजपाने आक्षेप घेतल्याने त्यावर सूचना मागविण्यात आल्या. परंतु भाजपाने केलेल्या सर्व सूचना अमान्य करत अखेर हे विधेयक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी आणि सभागृहात भाजपाचे सदस्य नसल्याचे पाहून महाविकास आघाडीने सदरचे विधेयक आवाजी मतदानाने पारीत केले.
हिवाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्या दिवशीच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याच्यादृष्टीने नियमात दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. या दुरूस्तीनुसार विधानसभा अध्यक्ष पदासाठी गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने करण्याचा अधिकार सत्ताधारी पक्षाला मिळणार आहे. परंतु नुकत्यात झालेल्या जि.प, नगरपरिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या विधान परिषदेच्या निव़डणूकीत महाविकास आघाडीची मते फुटली. यापार्श्वभूमीवर तसाच दगाफटका अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत होवू शकतो. यामुळे ही दुरूस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभेत संध्याकाळी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर संध्याकाळी चर्चा सुरू झाली होती. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक सदस्य सकाळी ११ वाजल्यापासून सभागृहाच्या कामकाजात सहभागी असल्याने प्रस्तावावरील चर्चा सुरु झाल्याने अनेक जण लॉबीत जावून बसले होते. भाजपाचेही जवळपास सर्वच सदस्य लॉबीत जावून बसले. सभागृहात विरोधकांच्या बाकावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह दोन चार आमदार सभागृहात होते. तर सत्ताधारी बाकावर फलोत्पदन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह एक-दोन राज्यमंत्री आणि काही आमदार उपस्थित होते.
तर दुसऱ्याबाजूला राज्य मंत्रिमंडळाची बैठकही सुरु झाली होती. मात्र मध्येच सांसदीय कार्यमंत्री अनिल परब हे सभागृहात आले आणि तालिका अध्यक्षांना अध्यक्षिय निवडणूकीबाबतच्या प्रस्तावावरील अहवाल मांडून तो मतास टाकावा अशी विनंती केली.
त्यावर सभागृहात उपस्थित असलेले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या प्रस्तावावरील अहवालाचे वाचन करत राज्य सरकारने सुचविलेल्या दुरूस्तीवर ज्या सूचना करण्यात आल्या त्या सर्व फेटाळण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी सदरचे दुरूस्ती विधेयक आवाजी मतास टाकत विधेयक आवाजी मतदानाने मंजूर केले.
विशेष म्हणजे या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी तालिका अध्यक्षांनी पुकारा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह लॉबीत बसलेले सर्व भाजपाच्या आमदारांनी आणि सत्ताधारी बाकावरील आमदारांनी एकदम सभागृहात धाव घेतली. तोपर्यंत दुरूस्ती विधेयक मंजूर करण्यात आल्याची घोषणा तालिका अध्यक्षांनी करून टाकली. त्यावर अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या दुरूस्ती विधेयकावरील सर्व सूचना राज्य सरकारने फेटाळल्याने आणि त्यावर चर्चा केली नाही म्हणून सभात्याग केला.