Breaking News

Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही

मराठी ई-बातम्या टीम

सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. या सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त करत स्वत: तरूण असताना गल्लीत क्रिकेट खेळत असतानाचा आणि परदेशात फुटबॉलचा सामना बघण्यासाठी गेल्यानंतर आलेल्या अनुभवाचा किस्सा त्यांनी यावेळी आवर्जून सांगितला.

या ऑनलाईन कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तकटरे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

आजचा हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री म्हटल्यानंतर राज्यासाठी कामे करणे येतेच. पण ही रस्ते, पाणी आणि इतर कामे करत असताना आपण एका गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करतो असं मला नेहमी वाटतं. जगावं कसं हेच आपण विसरून जातो. जगण्यासाठी खेळाची गरज आहे. हल्ली मैदानी खेळ मागे पडत चालले होते त्यांना आपण प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या पिढीमध्ये क्रिकेडचे वेड होते. पण आता फुटबॉलचे प्रेम आणि आवड फार झपाट्याने वाढत चालली आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी हे वाढणारे वेळ ओळखून ही सुविधा निर्माण केली आहे. एखादी जागा मोकळी आहे म्हटल्यावर पटकन तिथे विकासक येऊन टॉवर बांधून मोकळा झाला असता. पण तसे होऊ दिले नसल्याचे ते म्हणाले.

सगळ्या खेळांच्या सुविधा एका ठिकाणी उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. आमच्यावेळी गल्लीमध्ये क्रिकेट खेळाचे ते कधी मेन रोडवर आलेच नाही. माझ्या वेळेच्या अनेकांना वाटायचं की आपण क्रिकेटपटू व्हावं पण संधी नव्हती अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मी स्वतः तेजस ठाकरे यांच्यासोबत परदेशातल्या फुटबॉल सामन्यासाठी गेलो होतो. त्यावेळी स्टेडियममध्ये त्या क्लबचे फॅन्स त्यांचे झेंडे घेवून बसले होते. त्या त्या खेळाडूच्या समर्थनार्थ चांगली कामगिरी केली की जल्लोष करायचे. मात्र एकाबाजूला बसलेल्याने समोरच्या बाजूच्या अर्थात विरूध्द बाजूच्या खेळाडूबाबत काही बोललं की झालंच मग असे सूचक किस्सा सांगत त्यावेळी स्टेडियमध्ये मी आणि फक्त रेफरीचं (पंच) निष्पक्ष होतो. कारण मला आजही फुटबॉलमधले काहीच कळत नसल्याचे त्यांनी कबुलीही दिली.

माझी इच्छा अशी आहे की, फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघसुद्धा या स्टेडियममधून दरारा निर्माण करणारा व्हायला पाहिजे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची टीम कधी अर्धवट काम करणार नाही याची मला खात्री आहे आणि त्या कामाला सरकार नुस्ती मदत नाही तर प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही. फुटबॉलमधले जास्त काही कळत नसल्यामुळे उगाच काही अज्ञान प्रकट करु इच्छित नसल्याचे दिलखुलासपणे त्यांनी सांगितले.

Check Also

राहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका शस्त्राविना सैनिकांना बॉर्डरवर का पाठविले?

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लडाख येथील गलवान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या भारतीय-चीनच्या सीमेवर असलेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *