उद्धव ठाकरेंना केवळ बडबड करण्यापेक्षा दुसरे काहीच येत नाही. त्यांना ना महाराष्ट्राचे प्रश्न माहित, ना त्यांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला एवढंच बडबड करण्याचे आणि मत्सराने, द्वेषाने टोमणे मारणे हा उद्धव ठाकरेंचा स्थायीभाव झाला असल्याची टीका भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याच्या बाजू असून लोकांच्या नजरेत त्यांच्या वक्तव्याला शून्य किंमत असल्याची खोचक टीकाही यावेळी केली.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी काँग्रेसने अनेकदा जात जनगणना करू अशी आश्वासने दिली, घोषणा केल्या. परंतु खऱ्या अर्थाने सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन त्यांची प्रगती करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी १० वर्षाच्या कालावधीत केले. त्या जातींचा विकास सर्वार्थाने होणे गरजेचे आहे. तीच भुमिका घेऊन भाजपा आणि महायुतीचे सरकार कामं करतेय.
प्रविण दरेकर पुढे म्हणाले की, जयंत पाटील यांनी आरशात पाहावे. सत्तेत असताना महाराष्ट्रातील जनतेला काय दिले? शरद पवारांनी अनेक वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले. तरीही आज आम्ही तेच प्रश्न, त्याच गरजा, तेच विषय घेऊन बोलतोय-भांडतोय. याचा अर्थ तुम्ही सपशेल अपयशी ठरलात. उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सर्व ठप्प होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकार उत्तम काम करतेय, सर्वांगीण विकास होतोय. केंद्राच्या माध्यमातून गरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना कार्यान्वित होताहेत. जयंत पाटील यांना काय वाटते हे आमच्यासाठी महत्वाचे नाही, तर सर्वसामान्यांना काय वाटते हे आमच्यासाठी महत्वाचे आहे.
पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, बेरोजगारांना काम देण्यासंदर्भात मोदींनी अनेक योजना आणल्या. सरकारी आणि निमसरकारी भरतीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. ज्यांचे सरकारच येणार नाही त्यांनी कुठल्याही घोषणा करायच्या. कंत्राटी बेरोजगारांसाठीही आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यांचा कायमस्वरूपी हिताचा विचार निश्चितच करण्यात येणार आहे.
भाजपने सातत्याने मतदान जास्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न केलेला आहे. मतदान कुणालाही करा पण मतदानाचा लोकशाहीने, संविधानाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार बजवावा अशा प्रकारची भुमिका स्वतः पंतप्रधान मोदींसहित भाजपाची राहिली आहे. जगातील प्रगल्भ आणि मोठी लोकशाही आपली आहे. मतदान जास्त टक्के होणे हे लोकशाहीच्या सशक्ततेचे लक्षण असल्याचेही प्रविण दरेकर यांनी सांगितले.
विरोधकांनी पंकजा मुंडेंची काळजी करू नये
थकहमी कुणाला दिली जाते, त्याचे निकष काय आहेत त्या अर्थाने ती थकहमी त्यात्या कारखान्याला दिली जाते. पंकजा मुंडे यांनी स्वतः थकहमी नको अशी भुमिका घेतलेली मला माहित आहे. पंकजा मुंडे यांची काळजी विरोधकांना जास्त यायला लागलीय. पंकजा मुंडे यांच्यामागे ताकदीने उभे राहण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. राज्य-केंद्र सरकार आहे इतरांनी काळजी करू नये. आमच्यात काडी टाकून आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तो यशस्वी होणार नाही, असा टोलाही प्रविण दरेकर यांनी लगावला.