काही दिवसांपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज्यातील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाहिर पाठिंबा देत असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहिर केले. त्यानंतर भाजपासह महायुतीतील घटक पक्षांच्या समर्थनार्थ कधी सभा घेणार आणि कोण कोणत्या ठिकाणी जाहिर सभा घेणार याची माहिती लवकरच देणार असल्याचे सांगत पहिली जाहिरसभा नारायण राणे यांच्या रत्नागिरी-सिंधुदूर्गात आज घेतली.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले की, अयोध्येतील रामाचं मंदिर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळचं सर्वोच्च न्यायालय यांच्यामुळेच उभे राहिलं आहे असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, २०१४ ते २०१९ मध्ये ज्या काही गोष्टी पटल्या नाहीत त्यावेळी मला जे सांगायचं होतं ते सगळं व्हिडिओ दाखवून सांगून झालंय. मला काही गोष्टी पटल्या नाहीत, आजही पटत नाहीत. मला वाटतं, त्याबाबत आपण मोकळं असायला हवं. या गोष्टी पटल्या नाहीत, या गोष्टी पटल्या नाहीत, मग नोटबंदीची असेल किंवा पुतळ्यांची असेल ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या पटल्याच नाहीत. ज्या पटल्या त्याचं जाहिर कौतुक करायला मी मागे पुढं पहात नसल्याचेही यावेळी सांगितले.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, एक तर तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या बाजूने असता किंवा विरोधात असता. २०१९ साली मी जे काही बोललो ते बोलण्याची हिम्मत आजच्या विरोधी पक्षातही नाही. जर समजा अडीच वर्षे भाजपानं मुख्यमंत्री पद द्यायचं मान्य केलं असतं तर आज बोलला असतात का, कारण सत्तेचा बोळा कोंबला असता ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून यांच्या बुडाला आग लागली अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, भाजपाबरोबर २०१४ ते २०१९ साली युती होती म्हणून तुम्ही भाजपाबरोबर सत्तेत बसला होतात. त्यानंतर २०१९ ते २०२२ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झालात. एकूण साडेसात वर्षे सत्तेत बसलेले असताना राज्यातील उद्योग धंदे बाहेर का गेले असा सवाल उद्धव ठाकरे यांना करत यांचा खासदार विरोध करतो आणि आमदार पाठिंबा देणार आपण का विरोध करतोय हे तरी माहिती आहे का असा खोचक सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांना केला.