बहुचर्चित बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गासाठी नेमका कितीची टोल असणार याबाबत सातत्याने वेगवेगळे दर आकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र,समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधीच अर्थात काल १० डिसेंबर २०२२ रोजी राज्य सरकारकडून टोलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. तर आज लोकार्पण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यात १८ टोल नाके राहणार आहेत.
राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी यासह सर्व प्रकारच्या वाहनांसाठीचे दर जारी केले असून दर तीन वर्षांनी या टोलच्या दरात वाढ होणार आहे. त्याचबरोबर हे टोलचे दर २०३२ अखेर अर्थात १० वर्षांसाठी जाहिर करण्यात आले आहेत.
समृध्दी महामार्गासाठी जाहिर करण्यात आलेल्या टोल दरानुसार चार चाकी आणि हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर दर १ रू. ७३ पैसे पहिल्या तीन वर्षासाठी, दुसऱ्या तीन वर्षासाठी २.०६ पैसे, तिसऱ्या तीन वर्षासाठी २.४५ पैसे, चवथ्या तीन वर्षासाठी २.९२ पैसे असा राहणार आहे.
त्यानंतर हलकी व्यावसायिक, मालवाहतूकीची वाहने अथवा मिनी बस यासाठी प्रती किलोमीटर पहिल्या तीन वर्षासाठी २ रू. ७९ पैसे, दुसऱ्या तीन वर्षासाठी ३.३२ पैसे, तिसऱ्या तीन वर्षासाठी ३.९६ पैसे, चवथ्या तीन वर्षासाठी ४.७१ पैसे असा दर निश्चित करण्यात आला आहे.
त्यानंतर बस अथवा ट्रक यासाठी पहिल्या तीन वर्षासाठी ५ रू. ८५ पैसै प्रति किलोमीटर असा दर निश्चित करण्यात आला आहे. दुसऱ्या तीन वर्षासाठी ६.९७, तिसऱ्या तीन वर्षासाठी ८.३० पैसे, चवथ्या तीन वर्षासाठी ९.८८ रूपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.
तर तीन आसांची व्यावसायिक वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षासाठी ६.३८ रूपये प्रतिकिलोमीटर आकारण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या तीन वर्षासाठी ७.६० रूपये, तिसऱ्या तीन वर्षासाठी ९.०५, चवथ्या तीन वर्षासाठी १०.७८ इतका टोल दर आकारण्यात येणार आहे.
याशिवाय अवजड बांधकाम यंत्रसामग्री अथवा अनेक आसाची वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षासाठी ९.१८ रूपये प्रति किलोमीटर आकारण्यात येणार आहे. दुसऱ्या तीन वर्षासाठी १०.९३ रूपये, तिसऱ्या तीन वर्षासाठी १३.०२ रूपये तर चवथ्या तीन वर्षासाठी १५.५१ रूपये आकारण्यात येणार आहेत.
अतिअवजड वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षासाठी प्रतिकिलोमीटर ११.१७ रूपये आकारण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या तीन वर्षासाठी १३.३० रूपये, तिसऱ्या तीन वर्षासाठी १५.८४ रूपये, चवथ्या तीन वर्षासाठी १८.८७ रूपये आकारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे एकूण टोल भरताना सध्या देण्यात आलेल्या प्रतिकिलोमीटरचा दर गुणीले प्रवासा दरम्यानचे एकूण टोल नाके यातून जे उत्तर येईल तितका टोल वाहनचालकांना भरावा लागणार आहे. एखाद्या वाहनचालकाला ५ टोलच त्याच्या प्रवासात आले तर त्या प्रतिकिलोमीटरचा दर गुणिले तितके टोल असा गुणाकार करून जितकी रक्कम येईल तितका टोल वाहनचालकास भरावा लागणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
टोलनाके, वायफळ, सेलडोह वडगाव बक्षी, येळकेली, विरूल, धामणगांव (आसेगांव), गावनेर तळेगांव (शिवनी), कारंजा लाड, शेलू बाजार-वणोझा आदी ठिकाणी टोल नाके राहणार आहेत. तसेच या ठिकाणी फूड प्लाझा आणि अन्य सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहेत.
समृध्दी महामार्गावर बैलगाडी, दोन चाकी, तीन चाकी, सहा आसनी ऑटोरिक्षा, बैलगाडी, ट्रॅक्टर आदी वाहनांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून टोल दर जारी करण्यात आल्याचे आदेश: