Breaking News

विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाला उज्वल निकम यांचे प्रत्युत्तर, माझ्या पोतडीत….

कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना मारलं नाही, शहीद केलं नाही, या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे तीच काँग्रेसची भूमिका का आहे? जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला.
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी ॲड. उज्वल निकम यांच्या विरोधात केलेल्या विधानाची तक्रार मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली असून त्यांनी वड्डेटीवार आणि काँग्रेसवर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत वांद्रे पश्चिम येथील निवडणूक कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी माहिती दिली. यावेळी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार यांच्या आरोपावर बोलताना उज्वल निकम म्हणाले,  माझ्याकडे बरीच माहिती आहे. माझ्या पोतडीत बरेच काही आहे पण देशहित माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी, काही बोलत नाही, असा गर्भित इशारा काँग्रेसला दिला. तसेच विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केलेले आरोप बिनबुडाचे निराधार असल्याचे सांगत वड्डेटीवार पाकिस्तानला जे हवेय तेच का बोलत आहेत, असा सवालही ॲड. निकम यांनी केला.

यावेळी आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, विरोधी पक्षनेते वड्डेटीवार यांनी संशय निर्माण करणारी विधान केली, जी न्यायालयीन निवाड्याच्या विरोधातली आहेत, जी सत्य घटनेवर आधारित नाहीत, ती खोटी आणि असत्य आहेत आणि म्हणून केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी या पद्धतीचे विधान केले गेले आहे.

हे विधान बदनामी करणारे असून भावना भडकवण्याचा आणि या निवडणुकीमध्ये असत्य पसरवण्याचा प्रयत्न करणारे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर आणि वड्डेटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशा पद्धतीची तक्रार आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे असे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाला आम्ही काही थेट प्रश्न विचारू इच्छितो की, कसाब हा आतंकवादी होता, कसाबने गोळ्या झाडल्या, न्यायालयाने त्याच्यावर निवाडा दिला, आरोपीला शिक्षा झाली. मग जी भाषा पाकिस्तान करत आहे तीच भाषा काँग्रेस का करतेय?

दरम्यान, आशिष शेलार म्हणाले की, या विषयावर उद्धवजी आणि शिवसेना उबाठा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. कसाबला झालेली शिक्षा, कसाबने आपल्यावर आतंकवादी केलेला हमला, कसाबच्या मागे असलेला पाकिस्तानी आतंकवादी हात, आणि निवाडा जो न्यायालयाने दिला, यावर उबाठाचे मत काँग्रेसच्या समर्थनाचे आहे की नाही ? याचाही खुलासा करावा. वड्डेटीवार आणि काँग्रेस जे बोलत आहे ते उबाठा गटाला मान्य आहे का? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांना आ. ॲड. शेलार यांनी यावेळी विचारला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *