राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह ९ जणांच्या शपथविधी वेळी जितकी गुप्तता बाळगली गेली, तितकीच गुप्तता नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत आणि चवथ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाळत आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, चवथा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कोणाची नावे यादीत आदी गोष्टींची विचारपूस सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारमधील मंत्र्यांकडून खाजगीत चौकशी सुरु केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आलेले असताना पवार गटाच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावरून खल सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला शिंदे गटाच्या संभावित आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना धारेवर धरण्यास सुरुवात केल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर आपले मंत्री पद जाणार का की राहणार, नव्या मंत्रांकडे कोणतं खातं असणार, चवथा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार या चिंतेंने सध्या शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांना ग्रासले आहे. तर भाजपाच्या आमदारांना इच्छुक आमदारांना आणि खाते बदलासाठी इच्छुक असलेल्या मंत्र्यांकडून आपला नंबर लागेल या आशेने सध्या राजभवनाकडे वारंवार चौकशी करण्यात येत आहे.
यामध्ये शिंदे गटाचे दोन मंत्री आणि तीन इच्छुक आमदार सातत्याने राजभवनावर फोन करून चौकशी करत आहेत. भाजपाचे तीन मंत्र्यांकडून याबाबत सातत्याने विचारणा करण्यात येत आहे.
या चौकशी करण्यामध्ये सनदी अधिकारी आणि इतर प्रशासकिय अधिकारी असतानाच मुख्यमंत्री कार्यालय अर्थात सीएमओ कार्यालयातील मुख्यमंत्री कार्यालय सचिव दर्जाचे अधिकाऱ्यांनाही संभावित मंत्री आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही निरोप आला का म्हणून राजभवन आणि राजभवनाशी संबधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकार अस्थिर झाले की काय आणि नेतृत्वबदल तर होणार नाही ना अशी चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे.
राज्याचे क्रियाशील उद्योगमंत्री यांनी दोन दिवसांपूर्वी कोणाला कोणते मंत्रिमंद मिळणार याची अटकळ डोक्यात ठेवत कधीही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे जाहिर केले. मात्र २४ तासाचा कालावधी उलटून गेला तरी खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकची माहिती मिळविण्यासाठी दोन दिवसांपासून विविध प्रशासकिय अधिकाऱ्यांकडे सातत्याने विचारणा करण्यात येत आहे.
वास्तविक पाहता ज्या अजित पवार यांच्या कार्यपध्दतीचे कारण पुढे करत शिवसेनेच्या गटातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार शिवसेनेचे तर ५० अपक्षांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. आता त्याच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवित शिंदे गटाच्या मंत्र्यांना पुन्हा बसावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यात मतदारसंघात कोणत्या तोंडाने लोकांना सामोरे जायचे असा प्रश्न शिंदे गटाच्या मंत्र्यांसमोर निर्माण झाला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या सल्ल्याने कोणत्या मंत्र्यावर कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवितात असा प्रश्न शिंदे गटाच्या प्रमुख मंत्र्यांना पडला आहे. त्यातच अजित पवारांसह ९ जणांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर शिंदे गटाच्या आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात कधी करणार असा सवाल आता शिंदे गटाच्या आमदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
आमदारांपाठोपाठ आता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही कोणत्या बीन खात्याच्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार या अनुषंगाने राजभवनाकडे चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये दस्तुरखुद्द मुख्यमंत्री कार्यालयातील बडे अधिकारी सहभागी इतर विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे चौकशी करत असल्याने राज्याच्या प्रमुखांकडील खात्याच्या अधिकाऱ्यांनाच आता त्यांच्या प्रमुखाबद्दल विश्वास वाटेनासा झाला आहे की असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.