कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करत कधी जतमधील २८ गावांवर सांगितला तर कधी सोलापूर आणि अक्कलकोटवर दावा सांगत सोलापूरात कर्नाटक भवनची उभारणी करणार असल्याची घोषणा केली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आरे ला कारे ने प्रत्युत्तर देऊ असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला. त्यातच आज नागपूरहून समृध्दी महामार्गाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवात करणार असतानाच नागपूरात कर्नाटक सरकारचे पोस्टर नागपूरात लागल्याचे आढळून आले. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडले असून कर्नाटक महाराष्ट्रात घुसला तरी कधी आरे ला कारे करणार असा खोचक सवाल केला.
संजय राऊत म्हणाले, हे मुख्यमंत्र्यांना सरकारला दिलेलं आव्हान आहे आणि महाराष्ट्राला दिलेलं आव्हान आहे. आजच नाशिकमध्ये वृत्तपत्रात वाचलं की, भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार ते असं म्हणतात की कर्नाटकच्या आरेला कारे असं उत्तर देऊ. अरे आरे आणि कारेवाल्यानो कर्नाटक आतमध्ये घुसलं आहे, तुम्ही कधी कारे करणार? नागपुरला तुमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या थोबाडावर त्यांनी पोस्टर चिकटवलं आहे. कोणी म्हणतय गुजरातला येऊन बघा, कोणी म्हणतय कर्नाटकला येऊन बघा, कुठेय महाराष्ट्र तुमचा? चुल्लुभर पानी मै डूब जावो.. तशी तुमच्यावर वेळ आलेली आहे. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षावर आहे आणि तुम्हाला उद्यापर्यंत समजेल विरोधी पक्ष काय करतोय.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजुंनी तणाव निर्माण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. पण कुणी ‘अरे’ केल्यास आम्ही ‘कारे’ने प्रत्युत्तर देऊ, अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी शनिवारी मांडली. कर्नाटकातील भाजपाचे मुख्यमंत्री सातत्याने आक्रमक भूमिका घेत असताना त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने एवढय़ा ठोक शब्दांत प्रत्युत्तर देण्याची ही पहिलीच घटना आहे.
संजय राऊत म्हणाले, अरे कोण प्रसाद लाड ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का? भाजपा मधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक नवीन भाष्य करतो. हे काय दत्तो वामन पोतदार किंवा सेतुमाधवराव पगडी किंवा इतिहासकार जे यदुनाथ सरकार आहेत का? या भाजपाचं डोकं फिरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे, ती शक्तीच यांना संपवेल. शिवाजी महाराजांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार आहे. रोज कोणीतरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो अशी टीकाही त्यांनी केली.
मला असं वाटायला लागलं आहे, की यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी एक मंत्र देतो आणि मग हे अशाप्रकारे बोलतात. शिवाजी महाराजांवर अशाप्रकारे बोलण्याची यांची लायकी आहे का?, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला?, त्यांच महानिर्वान कुठे झालं? याबाबत अख्ख्या जगाला, देशाला माहिती आहे. रायगडावर त्यांची समाधी आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. आता तुम्ही नवीन शोध लावताय असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी भाजपा आमदार प्रसाद ला़ड यांचे नाव न घेता लगावला.
भाजपाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे का? जसं मुख्यमंत्र्यांनी एक नवीन नीति आयोग स्थापन करून त्याच्यावर आपल्या बिल्डर मित्राची वर्णी लावली. त्याप्रमाणे भाजपाने नवीन इतिहास संशोधन मंडळ निर्माण करून, तिथे असे हे सगळे जे लोक आहेत लाड, द्वाड यांची नेमणूक केली आहे का? आता हे महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहिणार आहेत का? कठीण आहे कशाप्रकारे सरकार चालवलं जात आहे? असा सवाल करत टीकाही केली.