Breaking News

अमित शाह यांचे शरद पवार यांना आव्हान

अमरावतीच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागण्याऐवजी,केंद्रात कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांसाठी, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी काहीच न केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागून प्रायश्चित्त घ्या, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी अमरावती येथील जाहीर विजय संकल्प सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले.

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा- महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भर पावसात झालेल्या सभेत आज अमित शाह यांनी शरद पवार, उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस, इंडी आघाडीचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. शरद पवार हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते, केंद्रात कृषीमंत्री होते, पण विदर्भातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नाही, त्यामुळेच विदर्भातील हजारो शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवली. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांची माफी मागा, असे आव्हानही यावेळी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. डॉ .अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रवी राणा, भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

अमित शाह पुढे म्हणाले की, भाजपाला ४०० हून अधिक जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार, असा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. या अपप्रचाराला बळी पडू नका, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने आरक्षण रद्द केले नाही, तर बहुमताचा वापर करून ३७० कलम रद्द केले, दहशतवाद संपविला, तिहेरी तलाक प्रथा रद्द केली, आणि सीएए कायदा जारी करण्यासाठी बहुमताचा उपयोग केला. जोपर्यंत देशात भारतीय जनता पार्टी आहे, तोवर एससी, एसटी व ओबीसींचे आरक्षण कोणीही रद्द करू शकणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे, अशी ग्वाही ही दिली.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, अमरावतीच्या उमेदवारासाठी दिले जाणारे एक-एक मत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महत्वाचे आहे, देशातील दहशतवाद आणि नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी महत्वाचे आहे आणि भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी महत्वाचे आहे. तुमचे प्रत्येक मत देशप्रेमी आणि देशविरोधी यांच्यातील लढाईत देशप्रेमींच्या बाजूने जाणार आहे, परिवारवादी आणि रामराज्यवादी यांच्यातील लढाईत रामराज्यासाठी जाणार आहे, असेही यावेळी सांगितले.

अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिराला काँग्रेसचा व इंडी आघाडीचा कायमच विरोध होता. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळून ७० वर्षानंतरही काँग्रेस व त्यांच्या आघाडीने अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न लोंबकळत ठेवला. सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षांतच मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केली, आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना करून मोदी यांनी रामभक्तांची अनेक दशकांची इच्छाही पूर्ण केली. या मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले, पण सोनिया गांधींच्या भीतीने त्यांनी ते नाकारले. शरद पवारांनाही निमंत्रण दिले, पण प्रकृतीचे कारण देत त्यांनी पाठ फिरविली. प्रकृती ठीक नव्हती, तर आता प्रचारासाठी कसे हिंडता, असा खोचक सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील एकएक तरुण काश्मीरसाठी प्राण देण्यास सिद्ध आहे, पण काँग्रेसला याची जाणीवच नाही. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यावर ५ ऑगस्ट २०१९ ला मोदींनी कलम ३७० रद्द करून काश्मीरला भारताचा कायमस्वरुपी अविभाज्य भाग बनविला, तर काँग्रेस मात्र कलम ३७० ला एखाद्या अनौरस अपत्याप्रमाणे कवटाळून बसली होती, दहा वर्षे सोनिया-मनमोहनसिंह यांचे सरकार होते, शरद पवार हे त्यांच्या सरकारात मंत्री होते, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नाही, असा थेट आरोपही यावेळी केला.

Check Also

कोलकाता पोलिसांनी मागितले राजभवनाचे सीसीटीव्ही फुटेज

कोलकाता पोलिसांच्या चौकशी पथकाने एका महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छेडछाडीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी.व्ही. आनंदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *