राज्यातील सर्वाधिक चुरशीची बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद (सुप्रिया सुळे)-भावजय (सुनेत्रा पवार) मधील निवडणूकीकडे सध्या महाराष्ट्रासह देशभरातील राजकिय वर्तुळातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच पवार कुटुंबातील शरद पवार विरूध्द अजित पवार असा सामना रंगला आहे. या लढतीच्या निमित्ताने अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे आंतरावली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बारामती हा शरद पवार आणि कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच या शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकियदृष्ट्या प्रचंड समंजसपणा असल्याने या काका-पुतण्यामध्ये कधी गैरसमज झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र या काका-पुतण्यामध्ये फूट पाडण्यात भाजपा कमालीची ठरली. त्यानंतर आलेल्या या पहिल्याच लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या राहिल्या आहेत. सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्यासाठी कुटुंबियांसह आणि राजकिय मदत करण्यासाठी राज्यातील अनेक भागातील अनेक लहान-मोठे राजकिय पक्ष आणि सामाजिक संघटना स्वतःहून पुढे आल्या.
तर दुसऱ्याबाजूला अजित पवार यांना त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडूण आणण्यासाठी त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या मार्फत विविध जात समुदायाच्या लोकांना आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार एकाबाजूला त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवित आहेत. तर दुसऱ्याबाजूला जय पवार हे पहिल्यांदाच मराठा आरक्षणाचा लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आंतरावली सराटी येथे जात भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याचे सविस्तर वृत्त पुढे आले नसले तरी मराठा आरक्षणाच्या लढ्या दरम्यान इंदापूर आणि दौड येथील सभेत जो प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मिळाला तो पाहता ही भेट निवडणूकीच्या निमित्ताने होती की कशासाठी होती याचे गुपित नक्कीच राहिलेले नाही.