Breaking News

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून आता काँग्रेस माझ्याविषयी अपशब्द वापरत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी टोंक-सवाई माधोपूर (राजस्थान) येथे आयोजित एका विशाल जाहीर सभेत बोलताना केला. काँग्रेसला सत्याची भीती वाटत असून छुपा अजेंडा उघड झाल्याने हादरलेली काँग्रेस आपली धोरणे लपवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल करत त्यांनी काँग्रेस वर नव्याने हल्ला चढविला.

व्होट बँक राजकारणाच्या दलदलीत बुडालेल्या काँग्रेसला बाबासाहेबांच्या राज्यघटनेचीही पर्वा नाही. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करण्याची भाषा केली असताना, त्यांचा एक नेता तर देशाचा एक्स-रे करण्याची भाषा करत आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडी सत्तेत असताना त्यांना दलित आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी करून त्यांच्या खास व्होटबँकेला आरक्षण द्यायचे होते, तर राज्यघटना याच्या पूर्णपणे विरोधात आहे, असा घणाघातही त्यांनी केला. बाबासाहेबांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना दिलेला आरक्षणाचा अधिकार काँग्रेस आणि इंडी आघाडीला धर्माच्या आधारावर मुस्लिमांना द्यायचा होता. काँग्रेस दलित आणि मागास विरोधी असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

एक स्थिर आणि प्रामाणिक सरकार देशाच्या विकासासाठी काय करू शकते हे गेल्या १० वर्षांत देशाने पाहिले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. भारत आज जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. गेल्या १० वर्षांत देशातील २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेतून बाहेर आली आहे. मतदारांच्या अचूक मतदानामुळे देशात अशी मोठी कामे झाली आहेत. भाजपा सरकारच्या काळात गरिबांना मोफत रेशन मिळाले, कायमस्वरूपी घर मिळाले आणि त्यांची चूल जळत राहिली आहे. २०१४ मध्ये देशातील जनतेने मोदींना दिल्लीत सेवा करण्याची संधी दिली, त्यामुळे देशाने अकल्पनीय निर्णय घेतले. २०१४ नंतरही काँग्रेस सत्तेत असती तर जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक झाली असती, शत्रूंनी सीमेपलीकडून येऊन आमच्या जवानांचा शिरच्छेद केला असता आणि काँग्रेस सरकारने काहीही केले नसते. काँग्रेसची सत्ता असती तर वन रँक वन पेन्शन लागू झाली नसती, माजी सैनिकांना १ लाख कोटी रुपये मिळू शकले नसते आणि देशात बॉम्बस्फोट सुरूच राहिले असते. राजस्थानमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे घोर पापही काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे सरकार असते तर कोरोनाच्या काळात कोणालाही मोफत रेशन किंवा लसीचे मोफत डोस मिळाले नसते आणि देशात महागाईची ओरड झाली असती, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने संविधानाशी खेळण्याचा प्रयत्न केला. संविधान बनवताना धर्मावर आधारित आरक्षणाला तीव्र विरोध होता, पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नेमके उलटे केले होते. त्यांचे हे विधान कोणापासून लपून राहिलेले नाही, ज्यात त्यांनी सांगितले की, देशाच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार कोणाचा आहे? हा योगायोग नव्हता, काँग्रेसची विचारसरणी नेहमीच तुष्टीकरणाची राहिली आहे. २००४ मध्ये सत्तेवर येताच काँग्रेसने सर्वप्रथम आंध्र प्रदेशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण कोटा कमी करून धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. हा एक पायलट प्रोजेक्ट होता, जो काँग्रेसला संपूर्ण देशात राबवायचा होता. २००४ ते २०१० या काळात काँग्रेसने ४ वेळा हा प्रयत्न केला, पण कायदेशीर अडथळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सजगतेमुळे काँग्रेसला आपल्या योजनांमध्ये यश मिळू शकले नाही. २०११ मध्येही काँग्रेसने असाच प्रयत्न केला होता. कर्नाटकात काँग्रेसने असाच प्रयत्न करून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला, पण मोदींना संविधान कळते, मोदी संविधानाला समर्पित आहेत आणि मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांची पूजा करणारी व्यक्ती आहे. सत्य हे आहे की काँग्रेस आणि इंडी आघाडी सत्तेत असताना त्यांना दलित आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाला छेद देऊन मतपेटीचे राजकारण करायचे होते आणि त्यांच्या विशिष्ट समाजाला वेगळे आरक्षण द्यायचे होते, तर राज्यघटना त्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. काँग्रेसच्या या कारस्थानांमध्ये दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण संपणार नाही किंवा धर्माच्या नावावर विभाजन होऊ दिले जाणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

देशातील जनतेची स्वप्ने हा माझा संकल्प आहे. गेल्या १० वर्षांच्या काळात आमच्या सरकारने जी कामे केली तो फक्त ट्रेलर आहे. देशाला खूप पुढे न्यायचे आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, माझा प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित आहे, म्हणूनच मी २०४७ साठी रात्रंदिवस काम करत आहे. भाजपाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राजस्थानचे कॅबिनेट मंत्री किरोडी लाल मीणा आणि टोंक-सवाई माधोपूर लोकसभा उमेदवार सुखबीर सिंह जौनपुरिया आणि इतर नेते या सभेत मंचावर उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *