लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली.
पहिल्या टप्प्यात १९एप्रिल रोजी १०२ मतदारसंघात आणि दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी ८८ मतदारसंघांसाठी मतदान झाले होते.
पहिल्या टप्प्यात पुरूषांनी ६६.२२ टक्के तर स्त्री मतदारांनी ६६.७ टक्के आणि तृतीयपंथीय मतदारांनी ३१.३२ टक्के मतदान केले. तर दुसऱ्या टप्प्यात पुरुष मतदारांनी ६६.९९ मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. तर स्त्री मतदारांनी ६६.४२ टक्के मतदान केले आणि तृतीयपंथीय २३.८६ टक्के मतदान केल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळाने दिली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन टप्प्यात झालेल्या मतदानात घट झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ६९.४३ आणि ६९.१७ टक्के मतदान झाले.
मतदानाच्या पहिल्या टप्प्यात, लक्षद्वीप (८४.१ टक्के) मध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदवली गेली, तर बिहार (४९.२६ टक्के) मध्ये १९ एप्रिल रोजी मतदान झालेल्या २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वात कमी मतदान झाले.
मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात मणिपूरमध्ये सर्वाधिक ८४.८५ टक्के मतदान झाले, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी ५५.१९ टक्के मतदान झाले.
लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत होत असून त्यामध्ये ५४३ मतदारसंघांचा समावेश आहे. दोन टप्प्यातील मतदान संपल्याने उर्वरित मतदारसंघात उर्वरित पाच टप्प्यांमध्ये ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान होईल. तर अंतिम मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.