मुंबई: प्रतिनिधी
राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच कविता, अभंग, समर्थ रामदासांच्या ओवींचा आधार घेत भाजपाच्या मुख्य विचारधारेवरच आघात केला. त्यासाठी खास ठाकरे शैलीत या खालील ओवी, अभंग आणि कवितेचा वापर केला. विशेष म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाषण करताना फक्त संत तुकारामांच्या एकाच अभंगाचा वापर केला होता. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन अभंग आणि एका कवितेचा वापर केला.
समर्थ रामदास स्वामी यांच्या ओळी
मना ना सर्वथा सत्य सोडू नको रे
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे
मना सत्य ते सत्य वाचे वदावे
मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे
विं.दा. करंदीकर यांची कविता
तें जरा समजून घे
ही लाट आहे तोवरी खुश्शाल तू गाजून घे! गाजण्याला अर्थ कितीसा? तें जरा समजून घे.
हे अशिक्षित रांगडे, प्रश्न पुसती भाबडे; पुसतात हे थोडे नसे! तें जरा समजून घे.
शतकानुशतकें जाहली पिळणूक ज्यांची या इथे, सुटल्यास त्यांची सभ्यता, तें जरा समजून घे.
त्या यौवनासह येतसे हा आग्रही उत्साहही; अतिरेक थोडा व्हायचा! तें जरा समजून घे.
त्यांना न अपुलें आवडे; त्यांचे रुचे ना आपणां; बीज प्रगतीचे विरोधी; तें जरा समजून घे.
प्रेमाप्रमाणे रागसुद्धा माणसांना जोडतों; मानवांतील गूढ नाते, तें जरा समजून घे.
टाळ झडती तेवढ्याने मानूं नको ही पंढरी; शूटिंग चाले या इथे! तें जरा समजून घे.
तुकाराम महाराजांचा अभंग
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥