आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांना उमेदवारी देणार होता. तशी मागणीही नसीम खान यांनी केली होती. परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांनी मुस्लिम उमेदवार देण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे आम्ही वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले.
शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आसाममध्ये मुस्लिम उमेदवाराबाबत जे विधान केले. त्या अनुषंगाने मुस्लिम उमेदवार नसीम खान यांना उमेदवारी देण्यास कधीही शिवसेना उबाठा गटाने विरोध दर्शविला नाही. त्याचबरोबर यासंदर्भात काँग्रेसनेही आम्हाला यासंदर्भात विचारणा केली नाही. तो त्यांच्या पक्षाचा अधिकार असल्याचेही यावेळी सांगितले.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत आम्ही कधीही धार्मिक राजकारणातून किंवा जातीय राजकारणातून पहात नाही. त्यामुळे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी आताही उत्तर मध्यमधील उमेदवार बदलावा असे सांगत मुंबई उत्तर मध्य हा मतदारसंघ आम्ही काँग्रेससाठी सोडला आहे, त्यामुळे तेथे कोणता उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध केला नसल्याचा खुलासा केला.