देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल, असा गंभीर इशारा राजकीय विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिला.
शुक्रवारी मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन अनुसुचित जाती/ जमाती/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती / ओबीसी व इमाव शासकीय- निमशासकीय कर्मचारी -अधिकारी संघटनेने केले होते. संविधानातील समता, बंधुता व भातृभावाचे तत्व समजून घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांनी सामाजिक जबाबदारीची भूमीका पार पाडावी, असे आवाहन कसबे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जयंती महोत्सवाचे अध्यक्ष व गृह विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात आणि संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे उपस्थित होते. मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात पुस्तक प्रदर्शन ठेवले होते. पुस्तक खरेदीला मोठा प्रतिसाद लाभला.
संविधानामुळेच आपण जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती करू शकलो, असे सांगून महापुरूषांच्या विचारावर मार्गाक्रमण करण्याची आवश्यकता राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खडतर विद्यार्थी जीवनाची माहिती प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितली. महापुरूषाचा विचार हाच महाराष्ट्राचा वसा व वारसा असून मंत्रालयातील सर्वांनी त्यानुसार आचरण करावे, असे मत संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ खरात यांनी मांडले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टीसाठी संघटनेने केलेल्या प्रयत्नांची माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी कथन केली,
प्रास्ताविक शिल्पा नातू यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संतोष साखरे यांनी तर आभार अनुज निखार यांनी मानले. कार्यक्रमाला संघटनेचे सुभाष गवई, चि. नि. सुर्यवंशी, पुष्पा साबळे , सरीता बांदिवडेकर, अशोक आत्राम, किरण गावतुरे; सुबोध भारत, भास्कर बनसोडे; दिलीप देशमुखदे, विदास भगुरे, डि. के. खाडे, निलीमा शिंदे, हेमराज बागूल, राहूल तिडके यांच्यासह सचिव, सहसचिव, उपसचिव, कक्षाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.