मुंबई : प्रतिनिधी
शेतीमालाला चांगली बाजार पेठ मिळावी आणि किंमत मिळावी या उद्देशाने उस्मानाबादहून मुंबईत येवून भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि मुंबई पोलिसांनी अटकाव केला. त्यामुळे या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर टेम्पोतून भाजी आणून भाजी फेको आंदोलन केले. यामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
सदर शेतकरी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मारिन लाईन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तसेच त्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज शर्मा यांनी दिली.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी मालाला बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने आठवडी बाजाराला परवानगी दिली होती. या योजनेच्या अनुषंगाने भूम येथील शेतकऱ्यांनी बोरिवली येथे आपला शेती माल विकायला सुरुवात केली. मात्र त्या जागेवर बसण्यासाठी मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि पोलिसांनी या शेतकऱ्यांकडे वारंवार पैशाची मागणी केली.
तरीही शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना विनंती करून शेती माल विकू द्या अशी विनवणी केली. मात्र महापालिका आणि पोलिसांनी त्यांना शेती माल विकू देण्यास मनाई केली. या विरोधात शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही अधिकारी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करतच होते. अखेर त्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच भाजी फेको आंदोलन सुरु केले.