मुंबई : प्रतिनिधी
विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकर्त्या सरकारवर हल्लाबोल केला त्यानंतर चौथा टप्पा २ ते १२ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात झाला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात मिळाला. कोल्हापूरपासून सुरु झालेल्या हल्लाबोल आंदोलनातील शेवटची सभा पुण्याच्या वडगांवशेरी-खराडी येथे झाली. आता पुढील हल्लाबोल आंदोलन कोकणात सुरु करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिलेले आहे. तसेच या हल्लाबोल आंदोलनाची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत सरकार आणि सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्व सेलचे अध्यक्ष, आमदार यांनीही भाजप-सेनेच्या कारभारावर हल्ला केला. एकंदरीतच राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांसह सर्वच नेत्यांनी हल्लाबोल आंदोलनामध्ये सरकारविरोधात आक्रमकता दाखवली.
कोल्हापूरपासून सुरु झालेल्या या आंदोलनाच्या सभांना जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत होता. दादांचा षटकार,तटकरेंचा चौकार आणि मुंडेचा बॉम्ब असा काही सभांमध्ये कोसळत होता की, सुरुवातीपासूनच्या सभा विक्रमी झाल्या. सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणारे हे आंदोलन रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत चालत असे. मात्र तरीही सभांमधील जनता सभा सोडून बाहेर पडत नव्हती इतका प्रतिसाद मिळत होता.
दिवसाला तीन सभा असं गणित असलं तरी काही दोन-तीन दिवस चार सभा या आंदोलनामध्ये झाल्या परंतु प्रत्येक सभांना मिळणारा प्रतिसाद राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जोष वाढवणारा ठरला.
राष्ट्रवादीमधील सुरुवातीच्या फळीमधील नेत्यांची भाषणे झाली की,दादा, तटकरे, मुंडे यांचे भाषणातील फटकारे जनतेला वस्तूस्थितीची जाणीव करून देणारे होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद सत्ताधाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारा ठरला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नावर सुरु केलेले हे आंदोलन सर्वांनाच आपलेसे वाटू लागले असल्याचे चित्र आहे.त्यामुळेच प्रत्येक सभांमध्ये जनता उत्स्फुर्तपणे सहभागी होताना दिसली.
विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असा हल्लाबोल केल्यानंतर आता कोकणातही हल्लाबोलचे वादळ घोंघावणार आहे. पुढील महिन्यात हे हल्लाबोल आंदोलन होणार आहे. मात्र त्याअगोदर १० जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता जाहीर सभा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यांच्या होणाऱ्या सभा सरकारविरोधी लढण्यास आणखी प्रोत्साहन देत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.