लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला अद्याप वर्षे दिड वर्षाचा कालावधी असतानाच देशासह महाराष्ट्रातील मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी इंडिया टूडे-सी व्होटर या कंपनीकडून नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचा तर भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, जे यश ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा आणि शिंदे गटाला मिळाले त्याची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवली असती तर अंदाजाला आधार मिळाला असता असे सांगत लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला ४-५ जागा जरी मिळाल्या तरी पुरेसे असे भाकित केले.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील, या निवडणुकीचा निकालाचा सर्व्हे हा सर्वांत मोठा असेल. जे आकडे समोर आले आहेत, ते आता निवडणुका झाल्या तर या गृहितकावर आधारित आहेत. मात्र दीड वर्षांनी निवडणुका होणार आहेत. आघाडी होणार आहे असे गृहित धरून निकालाचे अंदाज बांधने म्हणजे दिशाभूल आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही.
महाविकास आघाडीने मागील लोकसभेच्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकलेल्या आहेत, आगामी निवडणुकीत तेवढ्या देखील जागा महाविकास आघाडीला राखता येणार नाहीत. या राज्यामध्ये जे काम आम्ही करतोय, ते पाहून लोक खूश आहेत. लोक सुज्ञ आहेत. मागील अडीच वर्षात कामच झाले नाही. काम न करणाऱ्यांना लोक पसंदी देतील की काम करणाऱ्यांना लोकांना लोक निवडतील हे सर्वांनाच ठाऊक आहे, असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
त्यांच्या छातीत धडकी बसली आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत म्हणूनच हे खटाटोप काही पक्ष करत आहेत. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे. ते लोकप्रिय आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आधीच्या निवडणुकीतील सर्व विक्रम मोडीत निघतील. मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला मोठे यश मिळेल. महाराष्ट्रातही आम्हाला मोठे यश मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आकडेवारीला खूप महत्त्व असते. सध्याच्या ओपिनयन पोलमुळे कोणाला हर्षवायू झालेला असेल तर त्यांनी तो आनंद जरूर घ्यावा. त्यांचा आनंद मला हिरावून घ्यायचा नाही. आम्ही दीड वर्षे काम करत राहू. तुम्ही दीड वर्षे या ओपिनियन पोलचा आनंद घ्या, असा टोला शिंदे यांनी लगावला.