हिंदूत्ववादी आणि सावरकरवादी प्रेमात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या व्यस्ततेमुळे काल तीन व्यक्तींनी मंत्रालयाच्या परिसरात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एका अपंगाचा तर दोन महिलांचा समावेश होता. परंतु यातील एका महिलेचे आज उपचारा दरम्यान निधन झाल्याची माहिती बाहेर आली. त्यानंतर हिंदूत्ववादी आणि सावकरवादाच्या प्रेमात आखंड बुडालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला अखेर काही काळासाठी का होईना जाग आली असून नागरिकांना भेटण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांनी वेळा राखीव ठेवाव्यात असे आदेश आज दुपारनंतर जारी करण्यात आले.
इतर सरकारी कार्यालयांनी आठवड्यातील किमान दोन दिवस निश्चित करावेत तर मंत्र्यांनी आठवडा, पंधरवडा किंवा महिन्यातील एक दिवस आणि त्या दिवसातील ठराविक वेळ ही अभ्यागतांसाठीच राखून ठेवावी असे सांगण्यात आले आहे.
पूर्वपरवानगीशिवाय अनेक अभ्यागत नागरिक सरकारी कार्यालयांमध्ये येतात. त्यांच्या तक्रारींची आणि कामांची गंभीरतेने दखल घ्यावी. त्यासाठी दुपारी ३ ते ४ या वेळेमध्ये इतर कोणतेही विभागीय काम किंवा बैठका घेऊ नयेत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्याचबरोबर अनेक मंत्री मतदारसंघात भेटत नसल्याने अनेकदा राज्यातील जनता मंत्र्यांच्या भेटीसाठी कामे घेऊन मंत्रालयात येतात. मात्र मंत्र्यांनी त्यांच्याकडील कामकाजाचे स्वरूप विचारात घेऊन त्यांच्या सोईनुसार अभ्यागतांना भेट देण्यासाठी आठवडा, पंधरवडा किंवा महिना यांतील एखादा ठराविक दिवस व वेळ निश्चित करावी. त्याबाबतची कल्पना अभ्यागतांना द्यावी. तसेच भेटीची वेळ दर्शविणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा अशी सूचना मंत्र्यांना केली.
याशिवाय प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जनतेच्या भेटीसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून ठराविक वेळ राखून ठेवावी. ही वेळ दुपारनंतर ठेवण्यात यावी. या राखीव वेळेत शक्यतो बैठकांचे आयोजन करण्यात येऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय महत्वाचे म्हणजे, सरकारी अधिकाऱ्यांना अनेकदा शासकीय कामासाठी दौरे करावे लागतात. त्या दौऱ्यांचे आयोजनही लोकांच्या भेटीसाठी राखून ठेवलेल्या वेळेवर परिणाम होणार नाही असे करावे. त्याची माहिती मात्र तत्पूर्वी जनतेला द्यावी. ती कार्यालयातील सूचना फलकावर लावावी. आपत्कालिन दौरा असेल तर जनतेच्या भेटीसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असेही आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये कामासाठी येणाऱ्या अभ्यागतांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी लागणार आहे. तसेच प्रवेश पासची व्यवस्था करावी लागणार आहे. असे सामान्य प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नोंद करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी वेळा राखीव ठेवण्याबाबतचा आदेशः-