सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांना घेऊन जाण्यामागे नेमके कोणतं कारण आहे. यावरून बरीच चर्चा झडली. या दरम्यानच्या काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या घराघरात पोहोचलेली ५० खोके… या घोषणेवरून शिंदे गटाने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यावर ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले.
याबाबत ठाकरे गटाचे संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, ५० खोके एकदम ओके हे जनता म्हणते ना. आम्ही कुठे काय म्हणतो आहोत साडेबारा कोटी लोकांना समन्स बजावणार का? महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडली गेली ती खोक्यांच्या माध्यमातून पाडली गेली आणि जनतेला हे माहित आहे. त्यामुळेच ते अशा घोषणा देतात. मी जम्मू काश्मीरला गेलो होतो तिथे लोकांनी घोषणा दिल्या. तसंच जे समन्स बजावण्यात आलं त्यावर कायदेशीर उत्तर देऊ असंही स्पष्ट केले.
कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. आमची तयारी आहे. २ हजार कोटींचा आरोप केला गेला त्यात मानहानी झाली की नाही ते कोर्ट ठरवेल. महाराष्ट्रातली जनता बोलते आहे. आम्ही बोलत नाही हे काही शिवसेनेचं धोरण नाही असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, आमच्या विरोधात कोर्टात जा किंवा कुठेही जा. आम्ही तयार आहोत. आम्ही चोर लफंगे आहोत. कोर्टाने आमचं म्हणणंही ऐकून घेतलं पाहिजे. आम्ही कोर्टात सगळ्या आरोपांचं उत्तर देऊ. आम्ही जनतेच्या न्यायालयात प्रश्न मांडला पण ते कोर्टात गेले. आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही दिला.
बंड आणि गद्दारी यामध्ये फरक आहे. त्यामुळे या लोकांनी केलंय त्याला बंड म्हणू नका. तात्या टोपे यांनी केलं ते बंड होतं. या लोकांनी जे केलं त्याला गद्दारी म्हणतात हे गद्दारच आहेत असंही संजय राऊत यांनी ठणकावून शिंदे गटाला सांगितले.
वीर सावरकर या विषयावर आमचं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचं बोलणं झालं आहे. मल्लिकार्जून खर्गे यांच्या घरी बैठक झाली. त्यात शरद पवार यांनीही भूमिका मांडली. शरद पवारांनीही हे म्हटलं की वीर सावरकर हा विषय काढण्याची गरज नाही. आपल्याला मोदींशी लढायचं आहे की वीर सावरकर यांच्याशी लढायचं आहे? हे ठरवा असंही ते म्हणाले. गोंधळ होऊ देऊ नका असंही शरद पवार म्हणाल्याचं संजय राऊत यांनी सांगितले.