मागील काही दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामुळेही राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. त्यामुळे लोकसभा उमेदवारासाठी मतदानाचा दिवस असूनही आपले राष्ट्रीय कर्तव्य अर्थात मतदार राजा सकाळ आणि संध्याकाळच्या कमी उन्हाच्या कालावधीतच घराबाहेर पडत आहे. यापार्श्वभूमीवर काल दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात जवळपास ४३ टक्केच मतदानाची टक्के वारी होती. मात्र नंतर दुपारी ३ नंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लोकांनी रांगा लावून मतदान केल्याने ही मतदानाची टक्केवारी ६० टक्क्याहून अधिक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची संध्याकाळी ६ वाजे अखेर टक्केवारी पुढीलप्रमाणे :
वर्धा – ६४.८५ टक्के
अकोला – ६१.७९ टक्के
अमरावती – ६३.६७ टक्के
बुलढाणा – ६२.०३ टक्के
हिंगोली – ६२.५४ टक्के
नांदेड – ६०.९४ टक्के
परभणी – ६२.२६ टक्के
यवतमाळ – वाशिम – ६२.८७ टक्के.