शिरूर मतदारसंघातील विद्यमान खासदारामुळे पाच वर्षे वाया गेली. तो खासदार फक्त शुटींगला गेला. त्यामुळे विकास कामे झालीच नाहीत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हेंवर निशाणा साधत म्हणाले, मतदारसंघातील रस्ते, धरणे, रेल्वे असे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला केंद्राची,राज्याची मदत लागणार आहे. त्यामुळे काम करणारा माणूसाला निवडूण द्यावे असे आवाहनही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित नागरिकांना केले.
महायुतीचे शिरुरचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी महायुतीचे कार्यकर्त्ये उपस्थित होते.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, जुलै मध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो, त्यामुळे आंबेगावात ६०० कोटींची कामे मार्गी लावता आली. ८ दिवसांत हिरड्याच्या नुकसानीची १७ कोटींची भरपाई दिली. जिल्हा नियोजन मधून आंबेगावसाठी ६८ कोटी रुपये निधी दिला. सत्तेशिवाय काही उपयोग नाही, आम्ही जर सत्तेत नसतो तर ही कामे झाली असती का असा सवालही यावेळी उपस्थित केला.
कांद्याच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कांदा निर्यातबंदी उठविण्याचा प्रश्न आम्ही सर्वांनी एकत्रीत असल्याने मार्गी लावला, दुधाच्या दरवाढीचा प्रश्न, आता सुटेल. सत्तेत राहीले तर विकासकामे मार्गी लागणार आहेत.
तसेच यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, कळमोडी धरण, चासकमान धरणांचे प्रलंबित प्रश्न अल्पसंख्यांकांचे वक्क बोर्डाचे प्रश्न, हरिश्चंद्र देवस्थानचा विकास, पीर देवस्थानचा विकास अशी विविध कामे मार्गी लावायची आहेत. हे सर्व करण्यासाठी दिलीप वळसे पाटील, आणि या भागातील पक्षाचे उमेदवार हे आहेतच त्यांना निधी देण्याचं काम आम्ही करणार असून कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाहीही यावेळी दिली.