छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव शहरांच्या नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. नामकरणाविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे आहेत. या निर्णयामुळे दोन्ही शहरांच्या नावाला विरोध करणाऱ्यांना चपराक बसली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी नगर दौऱ्यावर आले असता म्हणाले की, उच्च न्यायालयाने नामकरणाला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव या दोन्ही नावाला मान्यता देऊन या विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत. जनभावना लक्षात घेऊन निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच संभाजीनगर आणि धाराशिवमधील नागरिकांचे अभिनंदन यावेळी केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री दोन दिवस संभाजीनगरमध्ये असल्याबद्दल विरोधक टीका करतील. पण ठाण मांडून बसल्याने संभाजीनगरमध्ये करेक्ट कार्यक्रम होऊन महायुतीचे औरंगाबादेचे उमेदवार यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. छत्रपती संभाजी नगर हे नाव व्हावे ही बाळासाहेब ठाकरे यांची मनापासूनची इच्छा होती. परंतु बाळासाहेबांचा वारसा सांगणारे, संपत्तीचे वारस असणाऱ्यांनी आम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर दिखाऊपणासाठी संभाजीनगरचा डाव रचला. परंतु त्यांच्याकडे बहुमत नसल्याने तो निर्णय बेकायदेशीर होता. त्यामुळे सरकार स्थापन केल्यावर आम्ही संभाजी नगरचा निर्णय घेतला. या निर्णयावर आज उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हा संभाजीनगरवासियांचा भव्य विश्वास असल्याचे सांगितले.