मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक क्लृपत्या लढविल्यानंतर अखेर शांत झालेल्या भाजपाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे वक्तव्य भाजपाच्या दोन मंत्र्यांकडे बघत केले आणि भाजपात हर्षोल्लासाचे वातावरण बघायला मिळाले. मात्र त्यास २४ तासाचा अवधी लोटत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने औरंगाबादेत ऑफर आणि नंदूरबार मध्ये सोबत अशी नवी राजकिय गणितं आकारला येणार की भाजपा राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापनार याबाबतच्या तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यातच आज नंदूरबार मधील एका कार्यक्रमासाठी फडणवीस हे एकाच गाडीने कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यामुळे शिवसेनेने दिलेल्या ऑफरला प्रतिसाद मिळण्या अगोदरच राष्ट्रवादीने भाजपाला पळविले का अशी शंका राजकिय वर्तुळात निर्माण झाली.
विशेष म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला सत्ताधारी तिन्ही पक्षातील दिग्गज नेते आणि विरोधी भाजपतील नेते एकाच मंचावर होते. याचे निमित्त होते ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्याचे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित होते. या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, यांच्यासह खान्देशातील सर्वच राजकीय नेते उपस्थितीत राहीले. मात्र तिन्हीही पक्षांनी काल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या पुढील संकेत देण्याचे टाळले.
परंतु काल मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित ते भावी सहकारीचे वक्तव्य करत अप्रत्यक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इशारा दिल्याचे सांगितले जात असून यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना सोबत घेवून राष्ट्रवादी भाजपा सोबत येवू शकतात असा संदेश अप्रत्यक्ष देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र एक नक्की की आगामी काळात कात्रजचा घाट शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला देणार की राष्ट्रवादी शिवसेनेला दाखविणार याचे उत्तर लवकरच मिळेल अशी शक्यता तुर्तास दिसून येत आहे.