मुंबई: प्रतिनिधी
केशवराव गोरे स्मारक सभागृहात यापूर्वी अनेक वाद व्हायचे पण ते वाद राज्याच्या हिताचे असायचे. एक सुसंवाद असायचा पण आज तो सुसंवाद पाह्यला मिळत नाही. आता कोथळा बाहेर काढण्याची भाषा वापरली जात असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
गोरेगांव येथील केशवराव गोरे स्मारक ट्रस्टच्यावतीने मृणालताई गोरे दालनाचे उद्वाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे ही उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मृणालताई गोरे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की, राज्याच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी प्रचंड योगदान दिले. त्या अनेकांपैकी काहींची आठवण ही प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना होते, त्यात मृणालताईंचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. मृणालताई गोरे सदनात असताना अनेकदा वाद व्हायचे पण ते राज्याच्या हिताचे असायचे. सुसंवाद पाहायला मिळायचा, तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आज मृणालताईंचं एक दालन सुरू होत आहे ही खरोखरच आपल्या सर्वांसाठी आनंदाची घटना आहे. या दालनामुळे मृणालताई गोरे कोण होत्या, त्यांचे काय कार्य होते, याची नाही म्हटले तरी थोडीशी झलक या दालनात बघायला मिळेल. खरंतर मृणालताईंचं सगळं जीवन अशा एका दालनात मांडण मोठं आव्हान आहे, कठीण आहे. आकाशात कडाडणाऱ्या वीजेला हातात पकडण्यासारखे असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले.
मृणालताईंची कामाची पद्धत अतिशय वेगळी होती. त्यांच्या कामाचा प्रभाव त्या काळातील सर्व विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर पडतच होता. म्हणून कळत न कळत कार्यकर्त्यांची एक पिढी नक्कीच मृणालताईंच्या सावलीत वाढली. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेतले. निवारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, निराधार महिलांचे प्रश्न हाती घेतले. अनेक विषयांना त्यांनी हात घातला. केवळ रस्त्यावर उतरून चळवळ करणं एवढ्यापुरतं त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. तर रचनात्मक काम काहीतरी कार्य उभे करण्यासाठी त्या प्रयत्नशील असायच्या असेही त्यांनी सांगितले.