जवळपास सव्वा महिना होत आला राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होवून. मात्र या सव्वा महिन्यात जितकी चर्चा एकनाथ शिंदे यांच्या उठावाची झाली तितकीच त्यांच्या प्रार्थनास्थळांना भेटी देण्याचीही झाली. तसेच आता शिवसेनेला प्रत्युत्तर म्हणून प्रतिसेनाभवनही बांधण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे गटाकडून करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी खोचक टोला लगावत म्हणाले, ते प्रतिसेनाभवन काय मंदिरही बांधू शकतील. त्यांची ताकद मोठी. पण त्यात देवही असावा लागतो. तो पहिल्या शिवसेना भवनात आहे असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
सोलापूर येथे जंयत पाटील हे आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी खोचक टोला लगावला.
जयंत पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना भवन बांधलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे गटाच्या सूरत, गुवाहाटी, गोवा प्रवासाचा उल्लेख केला. एकनाथ शिंदे गट नवे सेनाभवन बांधू शकेल. त्यांची ताकद फार मोठी आहे. सत्तांतरावेळी सुरतपासून जो प्रवास झाला त्यातून त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. ते प्रतिसेनाभवन बांधतील. मात्र मंदिर बांधलं तरी त्या मंदिरामध्ये देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे.
नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार असो किंवा खातेवाटप. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही प्रार्थनास्थळांना देखील भेटी दिल्या. यासंदर्भात बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक शब्दात मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी पूजा-अर्चा करण्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा, असेही ते म्हणाले.
त्यांनी आता राज्य चांगलं केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्तम प्रशासक त्यांच्यासोबत असताना त्याला दुसऱ्या क्रमांकाची जागा दिली. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले असते, तर वेगळी परिस्थिती असती. भाजपाने असा निर्णय कसा घेतला माहिती नाही असेही ते म्हणाले.
आता एकनाथ शिंदेंनी लवकरात लवकर कामाला लागावं. देव-धर्म, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पूजा-अर्चा करणं यात जास्त वेळ जात आहे. एकनाथ शिंदेंनी पूजा-अर्चा करण्यासाठी वेगळा मंत्री नेमावा, त्याला पूजा-अर्चा करण्याचं खातं द्यावं आणि मुख्यमंत्र्यांनी आता कामाला लागावं अशी आमची विनंती असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री कष्ट करतात याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. पण सरकार चालवणं वेगळं आणि एखाद्याला फोन करून पोलीस स्टेशनमधून सोडवणं वेगळं असतं. सरकार चालवण्याची व्यवस्था, वेगवेगळ्या विभागांना गती देणं हे काम त्यांनी करायला हवं. ते करू शकणार नाहीत असं मी म्हणत नाही. पण तिथे लवकर लक्ष द्यायला हवं. होम-हवनात आपला जास्त वेळ जायला लागला, तर जनतेसाठी वेळ कधी मिळणार हा माझा साधा प्रश्न आहे असा खोचक सवालही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना केला.