राज्यातील सत्तातंर नाट्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. शरद पवार हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील काही काळ सत्ता नसल्याने जे कोणी अस्वस्थ होते. आता सत्ता आल्याने त्यांच्यातील अस्वस्थता कमी झाली असेल असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे भेटण्यासाठी जात होते अशी माहिती पुढे येत असल्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, ते भेटायला जात होते. याची माहिती त्यांनीच सांगितली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही सांगितली आहे. त्यामुळे त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाल्यानंतर या गोष्टी होतच असतात अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली.
साधारणत: एक वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकारने नवा अध्यक्ष निवडण्याचे ठरविले आणि तसा प्रस्ताव राज्यपालांना पाठविला. मात्र त्यांनी त्यावेळी कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मात्र राज्यपालांनी चांगलीच तत्परता दाखवित अध्यक्ष निवडीचा सोपस्कार पार पाडत बहुमत चाचणीही घ्यायला लावल्याचे सांगत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या तत्परतेवरून शरद पवार यांनी टोला लगावला.
शिवसेनेत झालेय् बंडाबाबत विचारले असता ते म्हणाले की, उध्दव ठाकरे यांची काय कार्यपध्दती आहे. हे त्यांच्या पक्षातील लोकांनाच माहित. मात्र ठाकरेंना पहिल्यांच मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली आणि ते वर्षावर राह्यला गेले. त्यानंतर मध्येच त्यांची तब्येतीचे दुखणे वर आले. त्या अवस्थेतही त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी जी काही जबाबदारी बजावायची होती. ती त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडल्याचे सांगत त्यांच्या पक्षातील बाबींवर मी बोलणे योग्य नसल्याचे सांगत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.
यावेळी प्रत्येक राज्यांमध्ये भाजपाकडून राज्य सरकार पाडण्याचे आणि पक्ष फोडण्याचे काम सुरु असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, तुम्ही लोक फार लवकर विसरता, सर्वात आधी मध्य प्रदेशमध्ये काय झालं, महाराष्ट्रात काय झाले अनं आता गोव्यात जे काय होतय ते. गोवा आणि मध्य प्रदेश ही दोन्ही राज्ये महाराष्ट्राच्या जवळची आहेत. या अशा पध्दतीच्या गोष्टी घडवून आणून भाजपा देशातील लोकशाहीमधील असलेली व्यवस्था मोडकळीस आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दिल्लीत असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅमेऱ्यासमोर अमरावतीतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून निर्देश दिल्याच्या व्हिडिओबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, सध्या एकही सेंकद वाया घालवायचा नाही या उद्देशाने फोनवरून काम करण्याच्या पध्दतीने काम सध्या सुरु असल्याचा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
मी ही बंड केले. मात्र आमचे बंड हे फक्त सहा आमदारांचे होते. त्यावेळी सूरत, गुवाहाटी आणि गोवा अशी काही भारतभ्रमण करण्याची वेळ आमच्यावर आली नसल्याचे सांगत त्याकाळी तशी परिस्थितीही नव्हती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट करत नंतर मला जे सोडून गेले. त्यातील एखादा परत विधानसभेत दिसला. नंतर मात्र कोणी दिसले नसल्याचे सांगत लोक फार शहाणे असतात आम्ही फक्त दोन डोळ्यांनी पाहतो. मात्र आम्हाला पाहणारे लाखो डोळे असतात. त्यामुळे लोकांना चांगलं माहित असत कोण कधी काय बोलले आणि नंतर काय बोलले. आणि निवडणूकीत योग्य निकाल देतात असेही त्यांनी सांगितले.