जवळपास ६ महिन्यांपासून शिवसेना कोणाची या मुद्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत असून या प्रश्नाचा वाद सध्या केंद्रिय निवडणूक आयोगासमोर आणि सर्वोच्च न्यायालयातही सुरु आहे. त्यातच केंद्रिय निवडणूक आयोगासमोर ३० जानेवारी रोजी या दोन्ही गटांच्या वादावर सुनावणी होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना कुणाची? यावरून शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत प्रसारमाध्यमांना ती माहिती दिली.
यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: शिवाजी पार्कवरील एका जाहीर सभेत सांगितलं होतं, की आता माझ्यानंतर या शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे हे पूर्ण सांभाळतील. तुम्ही त्यांना साथ द्या, सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभा रहा आणि युवा म्हणून ती जबाबदारी आदित्य ठाकरे घेतील, असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्याची नोंद शिवसैनिकांनी घ्यावी असे आवाहनही केले.
दोन्ही गटांना लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आपलाच असल्याचा दावा केला असून ४० आमदार, १२ खासदार आणि अनेक पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी, काही आमदार व खासदार आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. शिंदे व ठाकरे गटाने आपल्या दाव्यांच्या पुष्टय़र्थ लाखो शपथपत्रे, कागदपत्रे आणि आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले सादर केले आहेत.
मुंबईसह राज्यातील १४ महापालिका निवडणूकांचे बिगूल कधीही वाजण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळावे यासाठी शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने जोर लावला आहे. तसेच राज्यातील शिवसैनिकांमध्ये अद्यापही यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत वरील माहिती दिली.