राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्यावतीने पहिल्यांदाच अयोध्या दौरा करत तेथील रामाचे दर्शन घेत राम मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधत अयोध्या दौऱ्यात रामाच्या दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता अशी खोचक टीका करत आम्ही अनेकदा अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं. आमच्यासोबत ही शिंदे गटाची टोळीही होती. त्यामुळे दर्शन आणि शक्तीप्रदर्शन यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. शक्तीप्रदर्शन करायला अयोध्येला जायची गरज नाही. ठाण्यातील नाक्यावरही शक्तीप्रदर्शन करता येते असा उपरोधिक टोलाही लगावला.
आज सकाळी संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी राऊत यांनी शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. हाच विचार आता राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे, त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरण्यात आल्याची टीकाही केली.
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यावरून शिंदे गटावर टीका करताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर गद्दारांविरोधात लढले. बाळासाहेबांचा हा विचार राज्यातील जनता अंमलात आणेल, असेही म्हणाले.
माझा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे, असं विधान अजित पवार यांनी केले होते. यावरही संजय राऊत बोलताना म्हणाले, अजित पवार हे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास आहे, तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण, देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही आहे. भाजपाच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नाही, असा उपरोधिक टोलाही राऊतांनी लगावला.