Breaking News

कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी राजकिय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु केली.
नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि वर्धा या सात लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. यापैकी भंडारा-गोंदीया वगळता बाकीच्या ६ ठिकाणी ५० ते ५५ टक्के मतदान झाले. गतवेळी या सर्वच मतदारसंघात ६० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. तसेच या वाढीव मतदानाचा फायदा भाजपाला झाला होता. परंतु यावेळी पुन्हा एकदा मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले.
यावेळी मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागे विद्यमान खासदारांच्या विरोधात असलेली नाराजी असल्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. तसेच महायुतीतील भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला विसंवाद आणि विद्यमान खासदारांच्या अर्थात उमेदवारांना मतदान न करण्यासाठी आलेले सोशल मिडीयावरील संदेश यामुळे स्थानिक जनतेमध्ये निरूत्साहाचे वातावरण दिसून आल्याचे यवतमाळ-वाशिम, नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि वर्धा मतदारसंघातील स्थानिक जनतेकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे या कमी मतदानाच्या टक्केवारीचा फायदा प्रथेप्रमाणे विरोधकांना होईल असा अंदाज एकाबाजूला व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या मताधिक्यामध्ये घट होईल मात्र तेच निवडूण येतील अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे या कमी मतदानाचा फायदा कोणाला होणार याची जास्त काळजी असल्याचे मत काँग्रेस-राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र निवडणूकीचे आणखी ५ टप्पे शिल्लक राहीलेले असल्याने यामध्ये ५ टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी सुधारून विजय खेचून आणण्याचे आव्हान आमच्यासमोर असल्याचे मत भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *