मुंबई : प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर प्रश्नांवर किसान सभेने नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला. शेतकऱ्यांच्या मोर्चा असल्याने शिवसेनेने पुढाकार घेत मोर्चेकऱ्यांचे स्वागत करत पिण्याच्या पाण्यासह खाण्या-पिण्याच्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. मात्र शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल घेतलीत म्हणून तुमचे पाणी स्विकारू पण खाण्याच्या-पिण्याच्या गोष्टी स्विकारणार नसल्याचे सांगत शिवसेनेचे आदारातिथ्य नाकारल्याची माहिती किसान सभेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.
हा लाँग मार्च नाशिक ते मुंबई दरम्यान पायी काढण्यात आला असल्याने या मोर्चात ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांना ठिकठिकाणी मुक्काम करावा लागला. या दरम्यान मोर्चेकऱ्यांना जेवण, चहा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी स्वत:च निधी गोळा केला. तसेच जेवणासाठी त्यांच्यातीलच सहभागी नागरीकांकडून धान्य गोळा करण्यात आले आणि जमा झालेल्या धान्यातून मोर्चेकऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे नाशिक ते खारेगांव फाट्या पर्यंत एकाही डाव्या पक्ष वगळता इतर पक्षांनी या मोर्चाकडे लक्ष दिले नाही कि त्यांना कशाची आवश्यकता आहे, याची पहाणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र मुंबईच्या वेळीवर अर्थात खारेगांव फाटा येथे मोर्चा पोहचल्यानंतर राजकिय पक्षाना जाग येत आणि केवळ प्रसिध्दीसाठी पाणी, फिरते शौचालय, बसण्यासाठी ताडपत्री, खाणे-पिण्याचे साहित्य पोहोचविले. त्यात शिवसेना, मनसे या पक्षाचे पदाधिकारी मोर्चेकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी धावले. मात्र मोर्चेकऱ्यांनीच या राजकिय पक्षांचा सन्मान म्हणून त्यांचे पाणी स्विकारले. परंतु त्यांचे इतर गोष्टीचे आदरातिथ्य नाकारल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रवासात किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा मोर्चेकऱ्यांनीच कोणत्याही पक्षाचे आदरातिथ्य स्विकारायचे नाही अशी भूमिका घेतली. तसेच या लॉग मार्चचा खर्चही स्वत:च्या खिशातून करण्याचा निर्णयही त्यांचाच होता. त्यामुळे इतर पक्षांचे आदरातिथ्य घेण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले.