मुंबई : प्रतिनिधी
शेतकऱ्यांसह, आदीवासी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नी किसान सभेने काढलेल्या लाँग मार्चची राज्य सरकारने उशीराने का होईना दखल घेत त्यांच्या मागण्याप्रमाणे तोडगा काढण्यासाठी संबधित मंत्र्यांना तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविले आहे. या मंत्र्यामध्ये अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर आणि आदीवासी मंत्री विष्णू सवरा यांना यांना बोलाविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लाँग मार्चच्या निमित्ताने मोर्चेकऱ्यांनी प्रामुख्याने वन जमिन कसणाऱ्यांना जमिनी मालकी हक्काने द्या, विना अट कर्जमाफी द्या, शेतीमालाला हमी भाव द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करा, आदीवासींच्या जमिनीचा प्रश्न सोडवण्यासह रेशन कार्डाप्रश्नासह अन्य मागण्याचे निवेदन यापूर्वीच राज्य सरकारला देण्यात आले होते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर मोर्चा येईल अशी शक्यता राज्य सरकारलाही वाटत नव्हती. त्यामुळे सरकारने या मागण्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र इतका मोठ्या संख्येने मोर्चा मुंबईत दाखल होत असल्याने या मोर्चाची दखल घेणे सरकारला क्रमप्राप्त पडले आहे. त्यामुळे या मागण्याशई संबधित विभागाच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या मोर्चेकऱ्यांना चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले असून या मंत्र्यांच्या बैठकीनंतर किसान सभेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलविण्यात येणार आहे. तसेच मुंबईत हा मोर्चा आल्यास शहरातील वाहतूकीवर त्याचा मोठा परिणाम होवून वाहतूक विस्कळीत होवून नागरीकांना त्याचा नाहक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रात्रीतच मोर्चेकऱ्यांना बोलविण्याचा प्रयत्न असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.