मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी, आदीवासी यासह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर किसान सभेने जरी मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाचा त्रास मुंबईच्या चाकरमान्यांना होवू नये यासाठी रात्री १२ नंतर सोमय्या मैदानावरून आझाद मैदानाकडे निघणार असून रात्रीत सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ.अशोक ढवळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफी द्या, वनजमिन कसणाऱ्यांना जमिन मालकी हक्काने द्या, शेती मालाला दिडपट हमी भाव द्या यासह स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी लाँग मार्च काढण्यात आलेला आहे. मोर्चेकऱ्यांचा त्रास मुंबईकरांना होवू नये यासाठी हा मोर्चा रात्री १२ वाजल्यानंतर आझाद मैदानाच्या दिशेने निघेल आणि रात्रीच त्या ठिकाणी पोहोचेल. त्यानंतर उद्या सकाळी सरकारशी चर्चा करण्याबाबत चर्चा करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय उद्या दुपारी कॉम्रेड सीताराम येचुरी आणि किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष हे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच ते या मोर्चाला संबोधित करणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.