राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून उपराजधानी नागपुरात सुरू होत आहे. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका, टिप्पणीला सुरूवात झाल्याचे आज दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी आज पत्रकार परिषदेतून विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांन यावेळी महापुरुषांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या पत्रकार परिषदेतूनच प्रत्युत्तर दिलं.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या अपमानाबाबत अजित पवारांनी केलेल्या टीकेवर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे, मांडीला मांडी लावून बसतात आणि महापुरुषांच्या अपमानाबद्दल हे बोलतात. वारकरी संतांबद्दल अतिशय हीन दर्जाने बोललं जातं. त्यांना मंचावर घेऊन हे महापुरुषांच्या अपमानाबद्दल बोलतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? हे देखील माहिती नाही.
याशिवाय, मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या संदर्भात बोलण्याचा अधिकार हा तुम्हाला नाही. महापुरुषांचा अवमान कोणीही करू नये. छत्रपती शिवराय आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचं दैवत आहे. पण त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न कोणी केला, तर त्याला तसच उत्तर हे देण्याची क्षमतादेखील आमची आहे. म्हणून याही संदर्भात योग्य उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं.