राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ५ बैठका मंत्रालयात तर ४ बैठका मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक झाल्या. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर राज्य सरकार सकारात्मक आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात आजवरची सर्वात मोठी वीस टक्के इतकी वाढ केली जाईल. तसेच २०,१८३ इतकी रिक्तपदे या मे महिन्यांपर्यंत भरली जातील अशी माहिती महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला दिली. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून आणि किमान वेतन मिळणार की नाही असा सवाल विरोधकांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना केला. मात्र त्यावर ठोस उत्तर मिळाले नसल्याने अखेर विरोधकांनी सभात्याग केला.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित केला. त्यानंतर भाजपाचे आशिष शेलार, राष्ट्रवादीच्या आदीती तटकरे, आणि अजित पवार यांनी यावर उपप्रश्न विचार ही वाढ अत्यंत अपुरी आहे असल्याचा मुद्दा पुढे केला. तसेच अंगणवाडी सेविकांना किमान वेतन मिळावे अशी आग्रही मागणी केली, विरोधक यावर आक्रमक झाले, मंत्री समाधानकारक उत्तर देत नाही असा आरोप करीत त्यांनी सभात्याग केला.
यावेळी झालेल्या चर्चेत बोलताना लोढा म्हणाले की, नव्याने सरकार स्थापन झाल्यापासून सात महिन्यात सरकारकडून चार वेळा या विषयावर बैठका झाल्या असून त्यातून जवळपास मार्ग निघण्याच्या टप्प्यावर सरकार आले आहे. त्यामध्ये रिक्त पदांची भरती करण्याबाबत निर्णय घेतला जात असून सेविका आणि सहायक यांच्या मानधनात २० टक्के वाढ केली जात आहे, याबाबतची तरतूद आगामी अर्थसंकल्पात केली जाण्याची शक्यता असून त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर बैठका घेतल्या जात आहेत. यामध्ये १५० कोटी खर्चून सेविकांना नवे मोबाईल दिले जातील , त्यात केवळ नाव सोडून बाकी माहिती मराठीत भरण्याची व्यवस्था केली जाईल असे मंत्री लोढा म्हणाले.
ग्रामीण भागात अंगणवाडी जागेसाठी एक हजार ऐवजी दोन हजार भाडे दिले जाईल. वीज बिल भरण्यासाठी पन्नास कोटीची तरतूद करण्यात आली आहे, शहरी भागात कंटेनर मध्ये आंगणवाडी सुरू केली जाईल, मुंबईत त्याची सुरुवात केली जाईल आणि अशा २०० आंगणवाड्या सुरू केल्या जातील अशी माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.