मराठी ई-बातम्या टीम
मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री असल्यापासून भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे असा संघर्ष असल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. त्यानंतर आज एकदम मुंडे यांनी फडणवीस यांच्या संयमाचे जाहीर सभेत कौतुक केल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या दोघांमधील दुरावा कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आष्टीत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांकडून संयम कसा राखावा हे शिकण्यासारखं असल्याचे उद्गार काढल्याने त्यांच्या या उद्गाराची चांगलीच चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.
काही लोक फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. ५०-५० टक्के जागा मागत होते. त्यावेळी फडणवीसांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे. यावेळी मी एक फॉर्म्युला दिला. मी म्हटलं ५० टक्के जागा दिल्या तर समोरच्याच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभं करा. शिरुरमध्येही युती करा, असेही फडणवीसांना सुचविल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकत्र होते. यावेळी दोघेही मनमोकळेपणाने गप्पा मारताना अनेकांनी त्यांना प्रसारमाध्यमात दाखविण्यात येणाऱ्या फुटेजमध्ये दाखविण्यात आले होते. त्यानंतर पंकजा मुंडेंनी फडणवीसांच्या संयमीपणाचं कौतुक केल्याने दोघांमधील संघर्ष कमी तर झाले नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
मी गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे. त्यांनी मला बेरजेचे राजकारण शिकविले. मात्र येथे बीड जिल्ह्यात गुणाकाराचे राजकारण शिकले. बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला मणक्याचा आजार झाल्याची टीकाही त्यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता यावेळी केली.
दोन वर्षात एखादा रस्ता मिळालेला नाही. दोन वर्षात कोणताही निधी मिळाला नाही. नवीन कामाचा एखादा नारळ फुटला का? तुमच्या लेकीने दिलेल्या बजेटच्या कामाचे नारळ फक्त फुटले आहेत. पण तुम्ही काळजी करु नका. लोक म्हणतील भाजपाचे नाही तर आघाडीचे सरकार आहे. पण आघाडीचं सरकार असले तरी केंद्रात तुमची लेक हक्काने निधी आणण्यासाठी बसली आहे. निधीची कमतरता कमी पडू देणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.