Breaking News

अजित पवार म्हणाले, चार-चार चौकशा झाल्यापण हाती काहीच नाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही माहिती देणार

राज्यातील सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणी मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आतापर्यंत चार वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यातील दोन चौकश्या या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात तर दोन चौकशा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना झाल्या. मात्र या चौकशांमधून हाती आलेले नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान उपस्थित केला. तर त्यावर उपप्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

साखर कारखाना विक्री प्रकरणातील चौकशी प्रकरणी ईओडब्लू, सीआयडी, निवृत्त न्यायाधीशा मार्फत आणि अन्य एका यंत्रणेच्या माध्यमातून अशा चार चौकशी समित्यांच्या मार्फत चौकशा करण्यात आल्या. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. या चारही यंत्रणांचे अहवाल मुंबई उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आले. परंतु तरीही याप्रकरणात आरोप करण्यात येत आहेत. आता या चारही चौकशांच्या अहवालाची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखाना विक्रीप्रकरणी आरोप करणाऱ्यांनी शिखर बँकेकडे जावे कारखाना चालवायला घ्यावेत असे आवाहन करत एक कारखाना चालवायला घेतल्यानंतर एक कोटी रूपये आणि एका पोत्यामागे ७५ पैसे शिखर बँकेला द्यावे लागतात. अनेकजण म्हणतात साखर कारखाना कर्जात गेला तर तुमच्याकडे पैसे कसे आले, तर जे काही पोत्यामागे बज्जच्या नावाखाली जे पैसे चेअरमन किंवा कारखाना चालविणाऱ्यांना मिळतात त्यातून ते पैसे येत असतात असे त्यांनी सांगितले.

अर्जून वीर साखर कारखाना पूर्वी फार चांगला चालत होता. मात्र आज तो ६२५ कोटी रूपयांच्या कर्जात अडकला असून आता त्याला चालविणे अशक्य झाले आहे. ज्या कोणी अर्जून वीर कारखाना घेतला त्यांनी प्रतापगड कारखाना आणि अन्य कारखाने घेतले. मात्र या सर्व कारखान्यांमध्ये त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागल्याचे सांगत १५० कोटीचा कारखाना आणि कर्ज ६२५ कोटी रूपयांचे कर्ज अशी अवस्था झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या उत्तरावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपप्रश्न उपस्थित करत म्हणाले की, चुकीची माहिती रेकॉर्डवर जायला नको म्हणून साखर कारखाना खरेदी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी अद्याप सुरु आहे. त्याची चौकशी अद्याप संपलेली नसल्याचे स्पष्ट केले.

त्यावर अजित पवार म्हणाले की, फडणवीसांचे बरोबर आहे. गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्यासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. परंतु तो अहवाल न्यायालयाने स्विकारला आहे का किंवा नाही याबाबत अद्याप काही समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *