राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल फोडल्यावरून मुंबई सायबर पोलिसांनी पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने जे काही झालं ते योग्य नव्हतं. यापूर्वी फडणवीस यांना पाच ते सहा वेळा पोलिसांनी प्रश्नावली पाठविली होती. परंतु काही कारणास्तव फडणवीसांनी प्रश्नावलीला उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या अधिकारात हजर राहण्यासंदर्भात पत्र पाठविले. इतकेच नव्हे तर केंद्रीय गृह सचिवांना जो पेन ड्राईव्ह देण्यात आला तो चौकशीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत पोलिसांनी त्यांनाही पत्र लिहिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.
मागील दोन दिवसांपासून फडणवीसांना पाठविण्यात आलेल्या पोलिस पत्रावरून भाजपाने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार, ॲड.आशिष शेलार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत त्यावर चर्चेची मागणी केली. परंतु विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी भाजपा आमदारांची ही मागणी फेटाळून लावली. मात्र बोलण्याची संधी दिली. त्यावर गृहमंत्री वळसे-पाटील यांनी वरील उत्तर दिले.
यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही ही गृहमंत्री होतात. तुम्हालाही माहित आहे. एखाद्या गोष्टीचा तपास करताना त्या तपास अधिकारी त्याला असलेल्या अधिकाराच्या अनुषंगाने तो निर्णय घेतो. मला तर अद्याप हे ही माहित नाही की पोलिसांनी फडणवीसांना काय प्रश्न विचारले आणि त्यांनी त्यावर काय उत्तरे दिली. मात्र फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह केंद्रीय गृह सचिवांना दिला तो पेन ड्राईव्ह ही तपासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांना पत्र पाठवित मुंबई पोलिसांनी केली.
तसेच फडणवीसांना जे पत्र पाठविण्यात आले ते पत्र त्यांना आरोपी म्हणून नव्हे तर साक्षीदार म्हणूनच पाठविले होते. तसेच यासंदर्भात प्रश्वावलीही फडणवीसांना पाठविण्यात आली होती. परंतु त्यांना त्यांच्या काही कामामुळे त्याला उत्तरे देण्यास जमले नसेल. त्यामुळे पोलिसांनीही त्यांचा जबाब कोठे घ्यायचा याबाबतचा निर्णय चर्चेनंतर घेतला. यामध्ये फडणवीसांना कशात गुंतविण्याचा किंवा अडकविण्याचा कोणताही हेतू राज्य सरकारचा नव्हता आणि नाही असेही स्पष्ट करत त्यामुळे हे सगळं थांबवा असे आवाहनही त्यांनी यावेळी फडणवीस आणि भाजपाला केले.