नुकतेच १० वीचे पेपर संपून इयत्ता बारावीचे पेपर सुरु आहेत. कॉपीमुक्त राज्याचा संकल्प केला. मात्र त्या संकल्पनेचा पुरता फज्जा उडाला. त्यातच आज १२ वी चा गणिताचा पेपर सुरु होण्यापूर्वीच सकाळीच फुटल्याची घटना उघडकीस आली. याबाबतचे वृत्त पसरताच विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या विषयी मुद्दा उपस्थित करत म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा… पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायत कसे, सरकार काय झोपलंय का ? असा संतप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे नुकसान असून यामागे कोणतं रॅकेट कार्यरत आहे का ? त्याचा तपास करुन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी सभागृहात केली.
अजित पवार म्हणाले, बारावीचे पेपर सुरु आहेत. आज सकाळी साडे दहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे गणिताचा पेपर फुटला. गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का ? याची सखोल चौकशी केली पाहिजे. बारावीची परिक्षा देणाऱ्या मुलांचे हे नुकसान आहे. दोषीवर कठोर कारवाई करुन राज्यात सातत्याने सुरु असणारे असे गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे काही कारणास्तव आज सभागृहात गैरहजर होते. त्यामुळे या प्रश्नी कोण उत्तर देणार असा प्रश्न सभागृहात उपस्थित राहिला. त्यामुळे याप्रश्नी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यांनी मंत्रिमंडळाची सामूहीक जबाबदारी म्हणून आज संध्याकाळ पर्यंत पेपर फुटीप्रकरणी सभागृहात निवेदन करणार असल्याचे आश्वासन दिले.