Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, किडक्या डोक्याचे लोक संभाजी राजेंना… श्रीमंत शाहु महाराजांना चुकीची माहिती देत आहेत

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संभाजी राजेंच्या उमेदवारी नाट्याप्रकरणी श्रीमंत शाहु महाराजांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडण्यासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधताना किडक्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत त्या लोकांना समजत नाही की अशी माहिती माहिती महाराजांना देऊन ते संभांजी राजेंना खोटं ठरवत आहेत. महाराजांच्या व्यक्तव्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात कोणाला होणार यासाठी कोणी सांगण्याची गरज नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

संभाजी राजे यांचे वडीलच श्रीमंत शाहु महाराजांनी आपले मत स्पष्ट व्यक्त केल्याने भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांची चांगलीच गोची केली. त्यावरून आपली बाजू सावरण्यासाठी फडणवीसांनी शरद पवार आणि शिवसेनेला जबाबदार धरले आहे.

शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले असले तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही. त्या संदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टपणे ट्विट करुन सांगितले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो मी जे बोललो ते सत्य बोललो. मला असं वाटतं की प्रतिक्रिया बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना समजत नाही की अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड दुःख असल्याचेही ते म्हणाले.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते आणि सध्या ही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचे कुठलेही नुकसान भाजपाला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही असे सूचक वक्तव्य करत म्हणून संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते अशी टीकाही त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता केली.

दरम्यान संभाजीराजे छत्रपती हे राजकारणात घेत असलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. तरीही ते अशाप्रकारे चुकीचा संबंध जोडत असतील तर ते चुकीचे असल्याचा निर्वाळा श्रीमंत शाहू महाराज यांनी दिला आहे. तसंच शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात काही मुद्दय़ावर राज्यसभेच्या उमेदवारीबाबत ठरले होते. यातूनच ही उमेदवारी काही कारणांनी ते देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याची टीका होणेदेखील चुकीचे असल्याचे मत शाहू महाराजांनी काल शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले होते.

शाहु महाराजांच्या या वक्तव्यानंतर  संभाजीराजे छत्रपती यांनी यावर समाज माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवताना ‘ मी सत्यच बोललो आहे’ असे म्हणत आपले विधान खरे असल्याचा दावा केला.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *