शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. मात्र राज्य सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने त्या तिन्ही निर्णयांना स्थगिती आपल्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जे सरकार अल्पमतात आले त्या सरकारला मंत्रिमंडळाची बैठकही घेता येत नाही. तरीही त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मात्र तो निर्णय बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा निर्णय घेणार असल्याचे जाहिर केले.
प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याची घोषणा दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे तो निर्णय कायदेशीररित्याच होणे आवश्यक होते. त्यानुसार हे तिन्ही निर्णय उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यादिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी त्यांच्या चार चार याचिकांवर तात्काळ निर्णय घेण्याऐवजी त्यावर घटनापीठ नेमून सुनावणी घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ते सगळे येवून आम्ही जिंकलो म्हणून फटाके वाजवायला सुरुवात केली. मात्र त्यांच्या याचिकेत काही दम नाही. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्याने न्यायालयानेही पुढील सुनावणी नंतर घेतो असे जाहिर केले. त्यामुळे विजय आमचा झाला पण फटाके ते फोडत आहेत. यावरून कळते कोण काय आहे ते असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
कोण म्हणतं आमच्यासोबत गेलेला एकही जण परत निवडूण येणार नाही. तर कोण म्हणतं गेलेले परत विधानसभेत पुन्हा दिसणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवून जे माझ्यासोबत आले त्या सर्वांना माहित आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे नेत आहोत. त्यामुळे माझ्यासोबत आलेल्या सर्वांची जबाबदारी मी घेतली आहे. यांच्यातील एकही जण जर पडला तर मी राजकारण सोडेन असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.