लोकसभा अध्यक्षांनी नव्याने असंसदीय शब्दांची एक यादी जारी केली आहे. या यादीमध्ये लोकसभेत मोदी सरकारवर टीका करणाऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच शब्दांना असंसदीय शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टीका करण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे शब्दच असंसदीय ठरविण्यात आल्याने राष्ट्रीयस्तरावर काँग्रेससह अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, लोकसभा अध्यक्षांनी यादी जाहिर केली आहे. पण त्यांनी नेमके कोणते आदेश काढले ते बघूनच सत्य काय आहे ते पाहू असे स्पष्ट केले.
मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांवेळी आज ते बोलत होते.
दैनंदिन संभाषणात वापरले जाणारे अनेक शब्द लोकसभा सचिवालयाने असंसदीय ठरवून सूचिबद्ध केले असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, यादी तयार केली आहे, पण नेमके आदेश काय आहेत ते बघितले जाईल आणि त्यावर सर्वपक्षीय नेते विचार विमर्श करतील. अध्यक्षांनी त्यावर अंमलबजावणी करणार नसल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे सत्य काय आहे ते पाहू.
लोकसभा अध्यक्षांकडून नव्याने जारी करण्यात आलेल्या यादीत खालीलप्रमाणे शब्द आहेत…
‘भ्रष्टाचार’, ‘बालीशपणा’, ‘नक्राश्रू’, ‘लज्जित’, ‘विश्वासघात’, ‘नाटक’, ‘ढोंगी’, ‘जुमलाजीवी’, ‘बालबुद्धी’, ‘कोविड स्प्रेडर’, ‘स्नूपगेट’, ‘अराजकतावादी’, ‘शकुनी’, ‘हुकूमशाही’, ‘तानाशाह’, ‘तानाशाही‘, ‘जयचंद‘, ‘विनाश पुरुष’, ‘खलिस्तानी’, ‘खून से खेती’, ‘दोहरा चरित्र’, ‘निकम्मा’, ‘नौटंकी’, ‘रक्तपात’, ‘रक्तरंजित’, ‘लज्जास्पद’, ‘अपमानित’, ‘फसवणूक’, ‘चमचा’, ‘चमचागिरी’, ‘चेला’, ‘बालिशपणा, ‘भित्रा’, ‘गुन्हेगार’, ‘गाढव’, ‘नाटक’, ‘लबाडी’, ‘गुंडागर्दी’, ‘ढोंगी’, ‘अकार्यक्षमता’, ‘दिशाभूल’, ‘खोटे’, ‘गद्दार’, ‘अपमान’, ‘असत्य’, ‘अहंकार’, ‘भ्रष्ट’, ‘खरीद फारोख्त’, ‘दलाल’, ‘दादागिरी’, ‘विश्वासघात’, ‘मूर्ख’, ‘लैंगिक छळ’ असे अनेक शब्द असंसदीय ठरविण्यात आले आहेत.
याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर स्पष्टीकरण दिले असून, लोकसभेच्या सचिवालयाने सूचिबद्ध केलेले असंसदीय शब्द संसदेच्या कामकाजातून काढून टाकले जातील. मात्र, संसदेच्या सभागृहांमध्ये कोणत्याही शब्दावर बंदी घातली जाणार नाही, असं स्पष्ट केले.
दरम्यान लोकसभा सचिवालयाने असंसदीय ठरवून सूचिबद्ध केले आहेत. सूचिबद्ध असंसदीय शब्दांची पुस्तिका प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत त्यास आक्षेप घेतल्याने वादंग निर्माण झाला आहे.
त्याबरोबर महाविकास आघाडीच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयास स्थगिती दिली. त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारलाच यासंबधी विचारावं लागेल.