महाड: प्रतिनिधी
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी गोळवली येथून जेवत असताना अटक करून त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री उशीरा महाड येथील सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. त्यावेळी सुरूवातीला राणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र १५ मिनिटाच्या अंतरानंतर राणे यांच्यावतीने जामीन अर्ज करण्यात आला. त्यावेळी दंडाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांना वैयक्तिक जात मुलक्यावर आणि अटींवर जामिन अर्ज मंजूर करत केला.
राणे यांचा जांमीन अर्ज मंजूर करताना त्यांना पुढील दोन सोमवार ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर हे दोन दिवस पोलिस अधिक्षक शाखेत हजेरी लावण्यास सांगण्यात आले. तसेच जामीनावर बाहेर पडल्यानंतर पुरावे नष्ट करणे किंवा त्याच्याच फेरफार न करणे, पोलिसांना ज्यावेळी चौकशीसाठी आणि आवाजाचे नमुने घेण्याची गरज वाटेल त्यावेळी त्यांनी हजर रहावे मात्र त्यासाठी पोलिसांनी ७ दिवस आधी राणे यांना नोटीस द्यावी या अटींवर आणि १५ हजार रूपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच अशाप्रकारची घटना पुन्हा होणार नाही असे बजावत साक्षिदारांवर दबाव न आणण्याच्या अटी न्यायालयाने राणे यांच्यावर घालण्यात आल्या.
संगमेश्वर येथील पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कागदोपत्री अटक झाल्याचे दाखवल्यानंतर महाड येथेही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याने त्यांना महाड येथे आणण्यात आले. आज रात्री १०:३० वाजता महाड सत्र न्यायालयात नारायण राणे यांना हजर केले असता महाडमधील सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी सरकारी पक्षाने आठ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी राणे यांना दिली. काही वेळानंतर राणे यांच्यावतीने जामिनासाठी त्याच न्यायालयात अर्ज करण्यात आला. यानंतर राणे यांच्या वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असता राणे यांना अटक करण्यापूर्वी नोटीस दिली नसल्याची बाब राणे यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर न्यायालयाने अखेर नारायण राणे यांना जामीन मंजूर केला.
नारायण राणे यांच्यावतीने अभिजित निकम तर शासनाच्या वतीने सरकारी वकील जोशी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. जामीन मंजूर करण्यात येताच राणे समर्थकांनी एकच जल्लोष केला.