Breaking News

८ एप्रिलला मुस्लिम बांधवानों घरातूनच नमाज अदा करा तर १४ एप्रिलला डॉ.आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात बदल करण्याचे शरद पवारांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तब्लिगीने मरकजचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यातील हजारो लोक सहभागी झाले, काही लोकांनी कदाचित कोरोना रोगाला बरोबर घेवून प्रवास केल्याचे नाकारता येत नसल्याने हा रोग फैलावतो की काय असे चित्र दिसत आहे. यापार्श्वभूमीवर ८ एप्रिल २०२० रोजी मुस्लिम समुदायाने हयात नसलेल्यांना कब्रस्तानमध्ये जावून स्मरण न करता घरातूनच करावे आणि १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करण्याच्या पध्दतीत बदल करून संभावित होणारी गर्दी टाळावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आज ते तिसऱ्यांदा समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

असे काही समारंभ असतात त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता पथ्य पाळली पाहिजेत. मात्र तब्लिगीने हे पथ्य पाळले नसल्याने याची किंमत मोजावी लागत आहे अशी भीती व्यक्त करतानाच पुन्हा असं घडता कामा नये याची काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी मुस्लिम बांधवांचा कब्रस्तानमध्ये एकत्रित जावून हयात नसलेल्या नातेवाईकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मात्र हे स्मरण घरात बसूनच करा. नमाजही घरातच बसून करा. ही वेळ किंवा प्रसंग एकत्रित बाहेर जाण्याचा नाही. त्यामुळे निजामुद्दीनमध्ये जे घडले ते घडू देवू नका याची खबरदारी घ्या असे सांगतानाच १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण श्रध्देने करण्याचा दिवस आहे. देशभरातून लोक एकत्र येत असतात आणि हा सोहळा दीड महिना चालतो. यावेळेला हा सोहळा साजरा करायचा हा प्रसंग आहे का? हा सोहळा पुढे न्यायचा विचार शक्य आहे का? हे गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून सामुदायिक एकत्र आलो तर नवीन संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मरण करुया. त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून या सोहळ्यात बदल करण्याचा जाणकारांनी विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले.

अजून लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना रोगाचे रुग्ण वाढत आहेत. दैनंदिन गरजा असतात. त्यामध्ये भाजीपाला, धान्य याची गरज आहे. परंतु याची कमतरता नाही असे सरकारकडून सांगण्यात आले होते. शिवाय किराणा दुकाने २४ तास उघडी ठेवली आहेत. मात्र त्याच्या वेळा ठरवाव्यात. परंतु धान्य मिळणारच नाही ही भूमिका घेवून गर्दी किंवा साठेबाजी करु नका असे आवाहन करत ते पुढे म्हणाले की,

सरकारने व पोलीस, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करावे. मात्र त्याची अंमलबजावणी काहीजण करत नाहीत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागते आणि त्यामुळे पोलिसांसोबत संघर्ष होतो आहे हे योग्य नाही. ते टाळूया. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस व पोलीस दलाचे लोक धोका पत्करुन अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांचा सन्मान करा. त्यांना पुर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  तरुणांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. दहा दिवस झाले, दोन आठवडे झाले.

राज्य सरकारने व स्वयंसेवी संस्थांनी रिलीफ केंद्रे उघडली आहेत. १ एप्रिलपर्यंत राज्यात कोरोनातील लोकांना मदत योजना म्हणून राज्यातील जिल्हा प्रशासनाने कुटुंब इथे नाहीत, रोजंदार, एकटे, प्रवासी यांच्यासाठी ८१७ ठिकाणी केंद्रे उघडली आहेत त्यामध्ये  ६४ हजार ९६९ लोकांची भोजन व्यवस्था, याशिवाय लेबर कॅम्प – १ हजार ७२१ ठिकाणी – २ लाख ४९ हजार ३९९ लोकांना सहभागी केले आहे. साखर कारखान्यात २८ कॅम्प असून त्यामध्ये २ हजार ५७५ मजुर आहेत. याशिवाय पाटबंधारे व विविध विकासकामे यावर ५७७ कॅम्प उघडण्यात आले आहेत. त्यामध्ये १५ हजार ३२३ मजूर काम करत आहेत. असे एकूण राज्यात ३ हजार १४३ कॅम्पमध्ये ३ लाख ३२ हजार २६६ लोकांना निवारा, अन्नधान्य व औषध सुविधा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील काही स्वयंसेवी संस्था गावागावात फिरून अन्न धान्य गोळा करून सोय करत आहेत. त्यांचाही हातभार लागत आहे. अशा स्वयंसेवी संस्था, दानशूर घटक यांचे अभिनंदन करत लवकरात लवकर गरजू लोकांच्या अडचणी दूर करुन, स्वच्छता ठेवून, एकत्रित म्हणजे समुदायाने न राहता सूचनांचे तंतोतंत पालन करुन या रोगावर मात करूया असे आवाहन त्यांनी करत काहीही झाले तरी हा रोग व त्याचा पराभव केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ऊर्मीने आपण सगळेजण सामोरे जावुया असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधतानाच सुरुवातीला रामनवमीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *