कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज मंडळी ठाण मांडून बसली होती. मात्र काँग्रेसला एकहाती सत्ता मिळविण्यापासून कोणी रोखू शकलं नाही. काँग्रेसला कर्नाटकात १३६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ‘दक्षिणेचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाणारे महत्वाचं राज्य भाजपाला गमावावे लागलं. या पराभवावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला खडेबोल सुनावले. कर्नाटकातील विजय हा काँग्रेसचे यश असून, आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव आहे, असं राज ठाकरे यांनी सांगत यातून सर्वांनी बोध घ्यावा असा टोला भाजपाला लगावला.
तसेच मागे एकदा माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेचा कधीही गृहित धरू नका, हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा, अस राज ठाकरेंनी सांगितले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या पराभवाचं विश्लेशण आम्ही करू. त्यासाठी आम्हाला कोणाची गरज नाही. भाजपा अनेक निवडणुका जिंकते, तर काहीत आमचा पराभव होतो. कोणीच अजय नाही. आमचा निवडून येण्याचा रेट हा इतरांपेक्षा चांगला आहे. यांचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. कधी-कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात. त्याचं विश्लेषण होईल, असं स्पष्ट केले.
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर येथे भाजपाने ईव्हीएमचा वापर केला नाही का, असा प्रश्न काही नेटकऱ्यांकडून विचारण्यात आला होता. या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी आज सकाळी एक व्हिडीओ ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाड जे बोलत आहेत, त्यापेक्षा मोठा मूर्खपणा कोणताही असू शकत नाही. जर ईव्हीएमचा वापर करायचाच असता, तर भाजपाने कर्नाटक निवडणुकीदरम्यानही केला असता. खरं तर काही लोकांना मूर्खासारखं बोलायची सवय झाली आहे. आव्हाडांनी आता डोकं वापरून बोलावं, हा माझा त्यांना सल्ला आहे, असा खोचक सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
🕒02.50PM 📍SambhajiNagar
LIVE | Media interaction https://t.co/1LwiqHP5HD— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 14, 2023