पुण्यात गेल्या दोन आठवड्यांपासून दोन थरारक घटना घडल्या.एमपीएससी परीक्षेत राज्यातून तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिची राजगडावर हत्या करण्यात आली. तर, सदाशिव पेठेत भर रस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला. या दोन्ही प्रकरणांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले. यावेळी त्यांनी आकडेवारीसहित राज्यातील महिला सुरक्षित नसल्याचाही दावा केला.
शरद पवार म्हणाले, २३ जानेवारी ते २३ मे या कालावधीत पुण्यातून ९६७, ठाण्यातून ७२१, मुंबई ७३८ आणि सोलापुरातून ६२ मुली अथवा महिला बेपत्ता आहेत. एकूण २४५८ महिला सहा महिन्यांच्या कालावधीत बेपत्ता झाल्या आहेत. गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत असं सुनावलं.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, दीड वर्षाच्या काळात बेपत्ता मुली आणि महिलांची संख्या ६ हजार ८८९ आहे. माझ्यामते राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत. बेपत्ता महिलांचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं पाहिजे, असं मतही व्यक्त केले.
तसेच नुकत्याच राजगडाच्या पायथ्याशी झालेल्या मुलीच्या खुनप्रकरणी बोलताना शरद पवार म्हणाले, पुण्यातील एक तरुणी जी राज्य प्रशासनाची अधिकारी बनणार होती. जिची निवडही झाली होती. तिची हत्या झाली. दुसऱ्या मुलीवर हत्येचा प्रयत्न झाला. सदाशिव पेठसारख्या शांत विभागात ही घटना घडली. याचा अर्थ इथली कायदा सुव्यवस्था ढासळण्याच्या स्थितीत आहे, अशी टीकाही केली.