आज पुण्यात कथित हिंदूत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढत छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक नव्हे तर धर्मवीर होते असे जाहिर करण्यात आले. यावेळी या संघटनांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर टीकाही करण्यात आली. या मोर्चाबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारमधील लोकं हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करत आहे. शिवसेना-भाजपा हे काम आधीपासूनच करत होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्याच मार्गावर असल्याचा आरोप केला.
यावेळी पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले, हे सरकार विकासाचं राजकारण नाही, तर हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करून मुस्लिमांचा चुकीचा इतिहास समोर आणून हिंदूंची दिशाभूल करण्याचं काम करत, असल्याचा आरोपही केला.
महाराष्ट्राचं नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज करा, आम्ही टाळ्यावाजवून त्याचं स्वागत करू असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना, निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी सरकारमधील लोकं मुस्लीम नावं बदलवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी अबू आझमी म्हणाले, मी कायद्याच्या चौकटी राहून काहीही बोलू शकतो. संविधानाने मला ते अधिकार दिले आहेत. राज्यात सध्या औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर हे तीनच जिल्हे आहेत. ज्यांची नावं मुस्लिमांच्या नावावर आहेत. ही नावं बदलवू नये. त्याने कोणताही विकास होणार नाही. उलट खर्चच वाढेल, असा इशाराही दिला.
काही सांप्रदायिक लोक टीव्हीवर येऊन हिंदू-मुस्लीमांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतात. या लोकांनी आता शुद्धीवर यावं. हा देश हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा सर्वांचाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जितका आदर इतर समाजातील लोक करतात, त्याहून अधिक आदर मुस्लिम समाज करतो. मुस्लिमांसाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. त्यांच्या सैन्यात ४० टक्के मुस्लीम सैनिक होते. वकील, सुरक्षा रक्षक सर्व मुस्लिम होते. मुळात ही लढाई धर्माची नव्हती, तर सत्तेची होती. राजा, महाराजांना धर्माशी काहीही देणेघेणे नव्हतं. त्यामुळे या गोष्टींवर राजकारण करणे चुकीचं आहे, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.