असंगाशी संग केल्याने काय होते ते त्यांना आता कळले. दोन्ही काँग्रेसशी त्यांनी सत्तेसाठी सोबत केली पण त्यांनी यांना रस्त्यावर आणून सोडले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजपच्या विजय संकल्प सभेला रविवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.
फडणवीस म्हणाले, सत्तेसाठी त्यांना खुर्ची महत्वाची वाटली आणि विरोधकांशी संसार थाटला. शिवाय पंचवीस भाजपशी युती सोडली अशी भाषा केली. काळाचा महिमा असा की असंगाशी संग केल्याने काय होते ते त्यांना आता कळले. दोन्ही काँग्रेसशी त्यांनी सत्तेसाठी सोबत केली पण त्यांनी यांना रस्त्यावर आणून सोडले. बेईमानी केली की काय होते ते त्यांना ६ महिन्यापूर्वी दाखवली आहे. शिवसेनेचा विचाराचा वारसा चालवणारे एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्ह मिळाले आहे. देशात भाजपची सत्ता आणण्याची सुरुवात कोल्हापुरातून करूया,असा संकल्प फडणवीस यांनी बोलून दाखवले.