महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता आणखी विकोपाला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वाहनावर कन्नड रक्षण वेदिका संघटने कडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापलं होतं. हे वातावरण निवळत असताना आज पुन्हा कर्नाटकातील गदग मध्ये महाराष्ट्रातील एका ट्रकवर काळे फासण्यात आल्याचा प्रकार समोर येताच शिवसेना युवानेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
मुंबईत माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने संयम पाळला असून आम्ही त्यांच्या सारखा धुडगूस घातला नाही. मात्र आमच्या संयमाचा अंत पाहू नका. कर्नाटकला सरकारला इशारा देत ते म्हणाले की, सीमाभागातील बेळगावात जाऊन दोन मंत्री काय, बोलणार होते, कोणाशी आणि कोणत्या विषयावर चर्चा करणार होते. तो भाग तर आमचा आहे. महाराष्ट्राचा आहे, त्यावर काय चर्चा होऊ शकते का? परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दम दिल्यावर आपले मंत्री घाबरले. आपले सरकार घाबरट असेल तर राज्य कसं चालणार राज्याला पुढे कसं घेऊन जाणार. मंत्र्यांनी जाऊन चर्चा करून काही होणार नाही. त्याकरीता या प्रश्नावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मध्यम मार्ग काढण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु असताना, कर्नाटकाकडून अशा प्रकारच्या कारवाया करणे किंवा त्या सुरू ठेवणे योग्य नाही असेही ते म्हणाले.
आपल्या राज्यात येणारे उद्योग गुजरात निवडणुकीसाठी जिंकण्यासाठी पळवण्यात आले. तशाच प्रकारे कर्नाटकच्या पुढील निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गावे पळवण्याचं काम सुरु आहे का?, असा खोचक सवाल करीत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा त्याच शब्दात टिका केली.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नावर एक शब्दही काढला नाही. त्यामुळे त्यांना शिवसेना नाव लावण्याचा अधिकार नाही. घाबरट सरकार जनतेला पुढे नेऊ नाही शकत, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर केली.