राज्याचे अधिवेशन सुरु होऊन शेवटच्या आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी बाकावरून एकमेकांना चिमटे आणि टोप्या उडविण्याचे प्रकार तसे कमीच पाह्यला मिळाले. परंतु दर अधिवेशनात विरोधी बाकावरील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्ताधारी बाकावरील भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांच्या टोप्या उडविण्यात येतात. परंतु आज चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची त्यांच्या लग्नावरून टोपी उडविली. मात्र त्यास आदित्य ठाकरे यांनी हजरजबाबी उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांना निरूत्तर केले. मात्र या दोघांमधील टोप्या उडविताना निर्माण झालेल्या विनोदामुळे विधासभेतील सर्व सदस्य हास्यकल्लोळात बुडाल्याचे दिसून आले. त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विधानाने तर एकच कोटी केली. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सभागृहातील हलके-फुलके झाल्याचे पाह्यला मिळाले.
नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिर यांनी रखडलेल्या वीज प्रकल्पाबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी या प्रश्नी व्याप्ती वाढवित पुढे म्हणाले, अनेक प्रकल्प सुरु होतात. पण काही कारणास्तव ते प्रकल्प बंद पडतात. मात्र प्रकल्प सुरु झाला म्हणून अनेक कामगारांची कामगार म्हणून लग्ने होतात. परंतु प्रकल्प बंद पडले ते कामगार विस्थापित होतात आणि त्यांची लग्ने तुटतात. त्यामुळे याची जबाबदारी कोणी तरी सरकारने घ्यायला नको का असा सवाल करत त्या अनुषंगाने धोरण तयारी करावे अशी मागणी केली.
त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लग्न ठरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची, लग्न तुटण्याची जबाबदारी राज्य सरकारची. पण एक वेगळा मुद्दा म्हणून राज्य सरकार याबाबत गंभीर विचार करेल असे आश्वासन दिले.
त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या लक्षवेधीची व्याप्ती वाढवित राज्यातील वीज कंपन्या आणि कोल वॉशिंग प्रकल्पाबाबतचा मुद्दा उपस्थित करत त्यातून निर्माण होणाऱ्या राखेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच प्रकल्प रखडल्यामुळे विस्थापित कामगारांचा प्रश्न मांडला.
त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाच्या निमित्ताने म्हणाले, बच्चू कडू यांनी कदाचित आदित्य ठाकरे यांना पाहूनच लग्न जुळण्याचा आणि तुटण्याचा विषय मांडला असावा असे सांगत टोपी उडविली. तसे असेल तर आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार असल्याचे सांगत चिमटा काढला. त्यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ उमटला.
त्यावर पुन्हा आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टोपी उडविण्याला प्रत्युत्तर देताना मिश्किलपणे म्हणाले, ‘ही काही वेगळी राजकीय धमकी आहेत की आमच्यासोबत बसा नाहीतर लग्न लावून देऊ’ असे ते म्हणताच सभागृहातील दोन्ही बाजूकडील सदस्य खळखळून हसू लागले.
त्यावर ‘कुणाचेही तोंड कसे बंद करायचे याचा हा उत्तम उपाय आहे’ असे फडणवीस म्हणताच, ‘तुम्हाला अनुभव आहे’ असा आवाज सभागृहातून आला. त्यावर ‘अनुभवातूनच बोलतोय’ अशी पुश्ती फडणवीस यांनी जोडली आणि सभागृहातील सदस्य पुन्हा खळखळून हसू लागले.
त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही आदित्य ठाकरे यांना चिमटा काढत म्हणाले, आदित्यजी आधी लग्न कोंढाण्याचे असे शब्दात चिमटा काढला. त्यावर सभागृहातील सर्वच सदस्य आदित्य ठाकरे यांच्यासह हास्यकल्लोळात सहभागी झाल्याचे पाह्यला मिळाले.